ऐतिहासिक शहर, संस्थानचा वारसा, मल्हारराव होळकर यांची राजधानी, कला, क्रीडा आणि संगीताची राजधानी असा लौकिक असणाऱया मध्यप्रदेशातील इंदौर शहराने सलग चौथ्यांदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान ‘नंबर वन’ किताब मिळवला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये जेव्हा या अभियानाची आणि स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा हे शहर देशात 140 व्या स्थानावर होते. मात्र अवघ्या तीन वर्षात या शहराने पहिल्या स्थानावर झेप घेत सर्वांना अचंबित केले. शहर तेच… नागरिक तेच… स्थानिक स्वराज संस्था त्याच… कर्मचारीही तेच…. शासकीय नव्हे सरकारी यंत्रणाही तीच…. तरीही एवढी झेप… अविश्वसनीय, अतर्क्य आणि अवर्णनीय…. अशा शब्दात याचे वर्णन करावे लागेल. 2017 ते 2020 या कालावधीत एक-एक आसमान पादाक्रांत करत गरुड झेप घेणाऱया इंदौरने स्वच्छता अभियानामध्ये ‘एक नया दौर’ सुरु केला आहे.
खानपान, मैफली आणि आदरातिथ्याची परंपरा
खरंतर इंदौर शहराची स्वतःची अशी एक विशिष्ट शैली आहे. खासकरुन येथील खानपान सेवा आणि अघळपघळ स्वागत करण्याची रित प्रसिद्ध आहे. इथं सराफा बाजार आणि छप्पन दुकानं ही तीर्थक्षेत्रं. कायम खवैय्यांच्या गर्दीनं फुललेली. पोहे, जिलेबी, चाट, नमकीन, कचौरी, गराडू, भुट्टे का कीस, सफरचंद परमल आणि साबुदाणी खिचडी ही खासियत म्हणावी. त्याचबरोबर मुगाचा हलवा, गाजर हलवा, रबडी, मालपुवा, फालुदा कुल्फी, गुलाबजाम, रसमलई, रसगुल्ल्या याच्यावरही खवय्यै अगदी समरसून ताव मारत असतात. अशावेळी त्यांची लागलेली तंद्री आणि इंदौर म्हणून प्रसिद्ध असणाऱया गायनाच्या मैफिलीमध्ये लागलेली रसिकाची समाधी एकच म्हणावी लागेल इतके इथले लोक खाण्यासाठी आणि खिलावण्यासाठी त्याचबरोबर गायन मैफिलींसाठी प्रसिद्ध आहेत. इथल्या खाद्य संस्कृतीमध्ये महाराष्ट्र, मुघली, बंगाली आणि राजस्थानी पद्धतींचे यथायोग्य मिश्रण आढळते. आणि इथलं स्थान खाद्य दाल बाफला तर अफलातूनच.
सोळाव्या शतकापासून इतिहास
सोळाव्या शतकापासूनच मध्य भारतातील हे शहर म्हणजे दख्खन म्हणजेच महाराष्ट्रासह अन्य दक्षिणी राज्ये आणि दिल्लीमधील मोठे व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा मार्गावरील हे शहराची स्थापना 1715 च्या सुमारास स्थानिक जमिनदारांनी केली आणि त्याला व्यापार केंद्र म्हणून नावारुपासही आणली. पुढे पहिल्या बाजीराव पेशव्याने माळवा प्रांत हस्तगत केल्यावर इंदौर संस्थान मराठा साम्राज्यात आले आणि मल्हारराव होळकर यांच्याकडे त्याचे अधिपत्य देण्यात आले. त्यांनीही या शहराला मोठा नावलौकिक प्राप्त करुन दिला. तथापि सर्वाधिक नावलौकिक हा अहिल्याबाई होळकर यांनी मिळवून दिला. उत्तम प्रशासकीय कारभार करुन त्यांनी शहराचा आणि होळकर घराण्याचाही देशभर डंका वाजवत ठेवला.
अभियानाच्या प्रारंभी 149 व्या स्थानावर
2 ऑक्टोबर 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म. गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ अभियान आणि सर्वेक्षण आणि स्पर्धेची घोषणा केली. या अभियानाची सुरुवात झाली तेव्हा इंदौर शहर 149 व्या स्थानावर होते. मात्र आज देशाला इंदौरचा आदर्श स्वच्छतेबाबत ठेवावा लागत आहे. ही इतकी प्रगती त्यांनी साधली ती अवघ्या तीन वर्षात आणि त्यानंतर पहिल्या क्रमांकावरचा आपला हक्क सलग चौथ्या वर्षातही अबाधित ठेवला आहे. तेच शहर आणि तीच सरकारी यंत्रणा असूनही हे सर्व साध्य झालंय ते लोकसहभाग आणि त्याला प्रशासन, लोकप्रतिनिधींची उत्तम साथ यामुळे.
अन् अवघ्या तीन वर्षात आयडॉल
इंदौरच्या या यशानंतर स्वच्छता विषयामध्ये हे शहर ‘आयडॉल’ बनून राहिले आहे. अगदी पाश्चिमात्य शहरांशी तुलना होईल इतकी तयारी केली आहे. इंदौर नगर निगमचे आयुक्त मनीष सिंह यांनी आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी घेतलेली कठोर मेहनत आणि त्यांना लोकांनी दिलेली साथ याचा हा सर्व परिपाक म्हणावा लागेल. मनीष सिंह यांनी शहराचा प्रत्येक भाग, रस्ता, वॉर्ड स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने तत्कालीन परिस्थितीचे विश्लेषण केले आणि त्यानंतर उपाययोजना मांडल्या. केवळ एक दिवस स्वच्छता करुन चालणार नाही तर यशस्वी होण्यासाठी हा यज्ञ अखंड सुरु ठेवायला हवा याची खूणगाठ मनाशी बांधली. अधिकारी-कर्मचाऱयांची हिम्मत वाढवली, त्यांना प्रोत्साहन दिले. निरनिराळय़ा टिम बनवल्या आणि मग सुरु झाली स्वच्छतेसाठीची लढाई. अखंड तीन वर्षे हे कार्य सुरु होते. यामध्ये प्रबोधनासह लोकांना स्वच्छता राखण्यासाठी आणि केरकचरा रस्त्यावर न टाकता त्यांच्या ट्रक, टेम्पोतच टाकण्यासाठी प्रेरित करण्यास प्रारंभ केला. त्यांनी शहराची विविध गट पाडत अधिक घाण, कमी आणि किमान स्वच्छ भाग अशी विभागणी केली.
सगळय़ांनाच संजीवनीचा डोस
कचऱयाचे निर्मुलन करण्याचीही स्वतंत्र तयारी केली. नवीन व्यवस्था निर्माण केली. स्वच्छतेचे ठेके दिलेल्या जुन्या कंपन्यांची हकालपट्टी करत ठेकेदारी संपुष्टात आणली. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारले. नगर निगमची स्वतःची पायाभूत सुविधांची यंत्रणा उभारण्यात आली. नगरनिगमची सर्व यंत्रणा सतर्क, सावध आणि सजग केली. त्याशिवाय स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलणेच अशक्य होते. केवळ आपण लढून भागणारे नव्हते, याची जाणीव असणाऱया प्रशासनाने राजकीय नेत्यांना बरोबर घेऊन नागरिकांनाही सहभागी करुन घेतले. आणि त्याची फळे आज चाखत आहेत.
असा मिळवले अव्वल स्थान…
1. स्वच्छता सर्वेक्षणाची पंतप्रधानांनी संकल्पना मांडल्यानंतर निगम आयुक्त मनीष सिंह आणि महापौर मालिनी गौड यांनी सर्व नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना एकत्र आणि नव्याने सफाई मॉडेल तयार करण्यासाठी सुरु केले प्रयत्न.
2. 2014 पर्यंत शहराची सफाई ठेकेदारी पद्धतीने चालायची. मात्र यामध्ये ठेकेदाराचीच अधिक मनमानी दिसून येत असे. ए टू झेड ही कंपनी प्रयत्न करुनही शहर साफसुधरे राखण्यास अपयशी ठरले होते. त्याचाही अभ्यास सुरु केला.
3. निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या परिषदेने सफाई यंत्रणेची सफाई करण्याला प्राधान्य दिले. अभ्यासाअंती निगमकडे शहर स्वच्छ ठेवण्याइतक्या पायाभूत सुविधा, साधने, मनुष्यबळ नसल्याचे समोर आले. तेच नसल्याने मग स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलणार कसे, हाच मोठा सवाल होता. मात्र त्यावर महापौर आणि आयुक्तांनी आपल्या स्वतःची यंत्रणा सुसज्ज करण्यावर जोर दिला. भाडय़ाने घेतलेल्या यंत्रणांचा तितकासा चांगला अनुभव नव्हता आणि खर्चही कमी होत नसल्याने हळूहळू सर्व यंत्रणा, साधने नगर निगमने खरेदी केली. आणि पहिला टप्पा सर केला.
4. त्यानंतर निगमच्या स्वतःच्या मनुष्यबळाची चाचपणी केली. त्यावेळीही भयावह दृष्य दिसून आले. कित्येक कर्मचारी फक्त हजेरी लावण्यासाठीच कार्यालयाकडे फिरक असल्याचे तपासणीमध्ये दिसून आले. विभागीय कार्यालयांचे तर एकदमच वाईट स्थिती होती. त्यांच्या हजेरीसाठी सक्ती करण्यात आली. हट्टवादी, कामचुकार कर्मचाऱयांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला. 700 पेक्षा अधिक कायम आणि रोजंदारीवरील कर्मचाऱयांना हकालपट्टी करण्यात आली. आयुक्त आणि महापौरांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱयांमध्ये दहशत निर्माण झाली. मात्र स्पष्ट संदेश देण्यात आला की जर काम कराल तरच नोकरी टिकेल अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
5. कर्मचाऱयांना दुरुस्त केल्यानंतर निगमकडे उपलब्ध असणाऱया सर्वच वाहनांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. अगदीच गरज पडली तर भाडय़ाने वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निगमच्या मालकीचे वर्कशॉप सुसज्ज करण्यात आले. विविध उपकरणे, तज्ञ माणसांची नियुक्त करण्यात आली. ज्यामुळे भविष्यात वाहन नाही या कारणाने स्वच्छतेचे काम थांबू नये, असे धोरण आखून त्याची अंमलबजावणीही सुरु केली.
6. खराब आहे, भंगार आहे, असे कारण सांगून चांगली वाहनेही बंद ठेवली जात होती. मात्र याच भंगारातून आयुक्त, महापौर यांच्या टीमने 200 गाडय़ा चालवण्याच्या स्थितीमध्ये आणल्या. दोन वर्षात गाडय़ांची संख्या 700 पर्यंत पोहोचली. यामध्ये 400 छोटी वाहने या शहरातील कचरा गोळय़ा करण्यासाठी नियुक्त करण्यात आली.
7. इतकी यंत्रणा सज्ज करण्यात आल्यानंतर थेट ‘बॅटलफिल्ड’ ही टीम उतरली. पहिल्यांदा उघडय़ावर शौच्याला जाणाऱयांचा बंदोबस्त करण्यात आला. त्यांना सर्व स्थरावर बदलण्यात आले. यासाठी सामदामदंड अशा युक्त्यांचाही कठोरपणे अंमल करण्यात आला. यासाठी विभागनिहाय आखणी करुन आणि प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन उघडय़ावरील शौच्याला जाण्याचे प्रकार बंद करण्यात आले. यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालय, मोबाईल टॉयलेटचीही निर्मिती करण्यात आली. आणि लोकांना त्यापासून परावृत्त करण्यात आले.
8. यासाठी तब्बल तीन महिने हे कर्मचारी राबत होते. शहराच्या प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक गल्लीत अन्य कामांपेक्षाही स्वच्छतेलाच प्राधान्य देण्यात आले. लक्ष्य फक्त एकच स्वच्छ भारत… स्वच्छ इंदौर… तेही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचेही ध्येय ठेवले.
9. लोकांना घंटागाडय़ांमध्ये कचरा टाकण्याची सवय लागावी यासाठी चौकाचौकातील कचराकोंडाळे हटवण्यात आली. यासाठी तब्बल 476 मार्गांची निश्चिती करण्यात आली आणि तब्बल 575 वाहने तैनात करण्यात आली. घरोघर जाऊन कचरा गोळा होऊ लागला. कारण त्यावरच इप्सित साध्य होणार होते आणि या अभियानाचे यशही सिद्ध होणार होते. याआधीच रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी घालून प्रसंगी दंड करुन ती कठोरपणे अमलातही आणली. याचे दृष्य परिणामही दिसू लागले. शहरात थोडीफार स्वच्छता दिसू लागली.
10. गोळा केलेला हा कचरा एका खुल्या जागेत आणला जात असून त्याचे खत करुन विक्रीही केली जात आहे. महापौर म्हणजे लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणा म्हणजे आयुक्त आणि जनशक्ती म्हणजे नागरिक या सर्वांनी हे अवघड शिवधनुष्य अवघ्या तीन वर्षांच्या परिश्रमाने पेलले आणि स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केली.
अवघ्या 45 दिवसांत बदलले समुहमन अन् न्यूयॉर्क टाईम्सकडूनही दखल
26 लाख लोकसंख्या असणाऱया या शहराने अवघ्या 45 दिवसांमध्ये ही सवय लावून घेतली आणि घंटागाडीमध्येच कचरा जाऊ लागला. इंदौरकरांच्या या सामुहिक, सामाजिक आणि सकारात्मक बदलाची नोंद ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या हेल्थ साईटनेही घेतली. लोकांच्या या बदलत्या सवयीवर समाज आणि समुह विज्ञानाच्या आधारावर मोठा लेखही छापून आला आहे. त्यांनी या लेखामध्ये दृढ इच्छाशक्तीपेक्षाही प्रत्येक व्यक्तीच्या मी किती सफल बनतो, स्वतःला किती तयार करतो या विषयावरच अधिक उहापोह करुन नागरिकांच्या प्रेरणेचे कौतुक केले आहे. छोटय़ाछोटय़ा संकल्पातून हे सिद्ध झाल्याचेही अनेक नागरिकांनी यावेळी मते मांडली आहेत. नवीन सवयी अंगिकारताना थोडे अवघड केले. पण नवे स्वीकारण्याची उर्मी अधिक प्रबळ ठरली, असेही मत मांडण्यात आले आहे. आणि नेमके हेच आहे इंदौरच्या यशाचे रहस्य. नवे करण्याची प्रबळ उर्मी इंदौरला सलग चौथ्या वर्षी अव्वल ठरवण्यात यश देऊन गेली आहे. ही नवी उर्मीच इंदौरला नवा आदर्श, आयडॉल आणि आकर्षण ठरवून गेली आहे. म्हणूनच देशभर स्वच्छतेचे नवा दौर सुरु करण्याचा मान इंदौरलाच मिळतो.
– संकलन : नितीन कुलकर्णी