श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीचे आशिर्वचन
प्रतिनिधी /मडगाव
मनुष्यजन्मातच परमेश्वराची भक्ती करण्याचे भाग्य सर्वांना लाभते. त्यामुळे शिस्त व शरीरावर ताबा ठेऊनच प्रत्येकांने चांगल्या गुणांचे आचरण करावे. आजच्या काळात प्रत्येकाने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवल्यास जीवनयात्रा सफल होते असे उद्गार श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाधिश श्रीमद् विद्याधिशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांनी काल सोमवारी म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानात आशिर्वचन करताना काढले.
श्री सांतेरी व श्री महालसा नारायणी देवींच्या जत्रौत्सवानिमीत्त महारथोत्सवास श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींनी उपस्थित राहुन विविध धार्मिक कार्यक्रमांत भाग घेतला. परमेश्वराचे आपण स्मरण केल्यानेच देव देवतांचा आशीर्वाद लाभतो. आज बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात देव भक्ती करणे गरजेचे आहे. प्रत्येकांने आपले कुलदेव, ग्रामदेवांचे स्मरण सदोदीत करावे असे स्वामीजी म्हणाले.
श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींचे संस्थानात आगमन झाल्यानंतर मंगलवाद्यांच्या गजरात तसेच पारंपारिक इलामतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवस्थान समिती अध्यक्ष श्रीवल्लभ पै रायतुरकर यांनी स्वामीजींचे स्वागत केले व सपत्नीक पाद्यपुजा केली. स्वामीजींनी श्री सांतेरी देवीच्या तैलचित्राचे तसेच देवस्थानच्या वार्षिक कार्यक्रम पुस्तकिचे अवानरण करण्यात आले.
श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींच्या हस्ते श्री सांतेरी व श्री महालसा देवींचे रथारोहण व ध्वजारोहण करण्यात आले. संस्थानचे सचिव संदीप पै वैद्य यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.
यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, श्री शांतादुर्गा संस्थान गोठणचे अध्यक्ष किरण पडियार, श्री दामोदर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे तसेच महाजन, कुळावी, भजक मोठय़ा संख्येने उपस्थीत होते. रात्री महारथोत्सव, अष्टावधान सेवा, महाआरती आदी धार्मिक विधी पार पडले.