ऑनलाईन टीम/तरुण भारत
नॅशनल हायवेवरील प्रवास आज रात्री 12 नंतर महागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसमान्यांना पेट्रोल, डिझेल गॅस आणि आता टोलच्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोल टॅक्समध्ये 10 ते 65 रुपयांपर्यंत वाढ केलीय. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलीय. 1 एप्रिलपासून महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशाला झळ बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिल्लीला जोडणाऱ्या महामार्गांवर कार आणि जीपचा टोल टॅक्स १० रुपयांनी वाढवला आहे. ओव्हरसाईज वाहनांच्या टोलमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक वाहनांचा टोल ६५ रुपयांनी वाढवला आहे.
५९.७७ किमी असेलल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील टोल शुल्कात किमान १० टक्के वाढ होणार असल्याचं समजतं. काशी टोल प्लाझा इथं एक्स्प्रेस वेवर सराय काले खानपासून ते शेवटपर्यंत कार आणि जीप यासारख्या हलक्या-मोटार-वाहनांसाठी टोल टॅक्स १४० रुपयांऐवजी १५५ रुपये होईल. तसंच, सराय काले खान ते रसूलपूर सिक्रोड प्लाझा पर्यंतचा टोल टॅक्स १०० रुपये आणि भोजपूरसाठी १३० रुपये होईल. तर इंदिरापुरमपासून हलक्या मोटार वाहनांसाठी काशीपर्यंत १०५ रुपये, भोजपूरला ८० रुपये आणि रसूलपूर सिक्रोडपर्यंत ५५ रुपये टोल द्यावा लागेल.
देशात सध्या १ लाख ४० हजार १५२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गावर एकूण ७२७ टोलनाके आहेत. तर सरासरी १९२ किलोमीटर अंतरावर एक टोलनाका आहे. दिल्ली ते हरिव्दार हे अंतर 212 किलोमीटर आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास लागतात आणि त्यासाठी 275 रुपये टोल द्यावा लागतो. तर दिल्ली ते लखनऊ या 528 किलोमीटर प्रवासासाठी 1050 रु. टोल द्यावा लागतो. देशातील विविध भागात अशाच प्रकारे कमी अधिक प्रमाणात टोल द्यावा लागतो. याचाच अर्थ सध्या सरासरी एका किलोमीटर प्रवासासाठी दीड ते दोन रुपये टोल द्यावा लागत आहे.