प्रतिनिधी /मडगाव
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने अत्यंत असंवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकारचा जनविरोधी अजेंडा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा जनतेची सोय ही सर्वोपरि आहे, यासाठी गोव्यातील सरकारने शपथविधी कार्यक्रम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
इंधन आणि एलपीजी दरवाढ तसेच गोव्यातील सरकारच्या शपथविधीला होणारा विलंब यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, कुंकळ्ळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एका संयुक्त निवेदनात भाजपच्या लोकविरोधी अजेंडय़ावर टीका केली आहे.
राहुल गांधींकडून भाजपची पोलखोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 5 मार्च 2022 रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत, ज्यात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर इंधनाच्या दरवाढीच्या अपेक्षेने लोकांना त्यांच्या इंधनाच्या टाक्मया पूर्ण भरण्याचे आवाहन केले होते. युरी आलेमाव म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपची पोलखोल केली आहे.
आता स्मृती इराणंच्या रोडशोची प्रतीक्षा
‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उशिरा का होइना पण पुन्हा एकदा भाजपच्या जुमल्यांची पूर्तता केली आहे. एलपीजीच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी आणि इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाल्यामुळे आता स्मृती इराणींच्या उत्साही रोडशोची प्रतीक्षा आहे’, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.
कार्यवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 28 मार्च 2022 रोजी आयोजित केलेल्या घोषणेवरही त्यांनी जोरदार टीका केली.
दरबार हॉलमध्ये ताबडतोब शपथविधी घ्या
‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा गोव्यातील जनतेची सुविधा सर्वोपरि आहे. गोव्यातील जनतेला ताबडतोब पूर्ण सरकार हवे आहे. इव्हेंट मॅनेजमेंटवर होणारा फालतू खर्च थांबवा आणि राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये ताबडतोब शपथविधी घ्या’ अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार स्थापन होण्या पूर्वीच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ करून प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची क्रूर चेष्टा केली आहे असे काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
‘भाजपच्या निवडणुकीतील जुमल्यांचा पर्दाफाश झाला आहे’ असे ते म्हणाले.
या दोन्ही नेत्यांनी जनतेला भाजपच्या जनविरोधी अजेंडय़ाबद्दल प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आणि भाजपच्या आमदारांनाही काटकसरीचे उपाय स्वीकारण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारण राज्याची तिजोरी यापूर्वीच भाजप सरकारने रिकामी केली आहे.