काही काही वेळा आपल्याला विशिष्ट गाणे ऐकताना वेगवेगळय़ा प्रकारच्या आठवणी येतात. कित्येक गाणी आपल्या आयुष्यातील कडूगोड प्रसंगांशी जोडलेली असतात. तर कित्येक गाणी अशा काही प्रसंगांनी घडलेलीही असतात. विरह गीत ऐकल्यावर आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जाग्या होतात. पोवाडा ऐकल्यावर मनातली शौर्यभावना उफाळून उठते. प्रिय व्यक्तीच्या सान्निध्यात प्रेमगीतांची पारायणे आपसूकच होतात. बहुधा दुःखद प्रसंग पाहिल्यावरच अशी अर्थपूर्ण गाणी आपल्या मनात रुंजी घालतात. कारण सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे…असे तुकोबाराय म्हणून गेले आहेत. त्याप्रमाणे आयुष्यात दुःख हे भोगून संपणार नाही एवढे असते आणि त्यातच कुठेतरी किलोभर शिऱयातल्या चुकून मिळणाऱया चारोळीएवढीच वाटणी शुद्ध सुखाला मिळते. आणि एक काय आहे माहीत आहे का? दुःखद प्रसंगीच माणसाला खरी जाण, समज, ज्ञान प्राप्त होते. मुखवटय़ामागचे चेहरे कळून येतात. लळा जिव्हाळा शब्दच खोटे माश्या मासा खाई, कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही. चिमणाचिमणीने आयुष्यभर काडी काडी जमवून घरटे बांधायचे. दाणा दाणा स्वतः उपाशी राहून पिलांना भरवायचा आणि पिलांनी मोठे झाल्यावर कधीच परत न येण्यासाठी दूर उडून जायचे. आणि मग त्या म्हातारा म्हातारीला कुणी सांभाळायचे आणि त्यांनी कुणाकडे राहायचे या विषयावर जेव्हा सख्ख्या भावंडांमध्ये कडाकडा भांडणं होतात तेव्हा आवंढा गिळत, डोळय़ातून पाणी काढत एका बाजूला जुडी करून बसलेल्या त्या म्हाताऱयांना खरोखरच हे गाणे आठवणार नाही का हो? ते मनात म्हणतही असतील की अण्णा तुम्ही फार फार खरे लिहून गेलात हो! रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया? कोण कुणाची बहीण भाऊ पती, पुत्र वा जाया सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही..आणि बाबूजींनाही विचारत असतील की तुम्ही इतके कळवळून का गायला असाल ते आता कळतंय हो! प्रसंग असे असतात आणि हाक मारावी तेव्हा तशी गाणी आठवतात. लिहिणाऱयाची, गाणाऱयाची आणि संगीतकाराची ही काय म्हणून ताकद म्हणावी? किती म्हणून ही एकरूपता असावी?
संदीप खरे यांचे असे एक गाणे आहे. खेडय़ातल्या एकाकी पण नेटक्मया घरात जिद्दीने एकटा राहणारा आणि रोजची कामे टुकीने करत ताठ मानेने जगणारा माणूस पाहिला की हे गाणे मुळी डोक्मयात घुमायला लागते. बिभासवर आधारित असलेल्या या गाण्याचे संगीतसूचन इतके प्रभावी आहे! त्यात गंभीर मूड आहे पण जबरदस्त आशावाद आणि कणखर मन दिसत राहते. येवढंच ना? एकटे जगू आमचं हसं आमचं रडं ठेवून समोर एकटेच बघू..कधीतरी खिडकीतून तो माणूस फोनवर बोलताना आवाज येतो. ठीक आहे. कुणीही नाही आलात तरीही चालेल. आलात तर ठीकच आहे. लगेच जायचे असेल तरीही बघा काय ते तुमचे..मी इथेच आहे. आणि मी समर्थ आहे करायला.’ मग आठवते. आलात तर आलात तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय? स्वतःच पाय, स्वतःच वाट स्वतःच सोबत होऊन जगू येवढंच ना? एकटे जगू…..समानुभूती म्हणतात ती हीच! त्यावेळी तो माणूस म्हणजे मूर्तिमंत ते गाणे जगत असतो म्हणून त्याच्याकडे बघून ते गाणे आठवते! अंगणाला कुंपण नसते तर कधी घराला अंगण नसते, पण कधीच्या काळचे सगळे भास उराशी गच्च धरून एकला माणूस जोग्यासारखा जगत असतो.
माणसांत एक अजब जात आहे. त्यांना जग वेडे म्हणते कारण ते कुणाचीही फिकीर न करता अशक्मय असणारे काही एकटय़ाने पेलू पहात असतात. अख्खे जग त्यांना हसत असते पण ते फिकीर करत नाहीत. त्यामध्ये कोण कोण असतात. एकटय़ाने डोंगर फोडून रस्ता तयार करणारे असतात, कुणी बियाणे बँक करणाऱया राहीबाई पोपेरे असतात तर कधी स्मशानात राहून एकटय़ा तगलेल्या सिंधुताई असतात. मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी एकटय़ाने धडपडणारे वेडे डॉक्टर असतात. यांना पाहिले की गुरुदेवांचे फेमस गाणे आठवते. जोदी तोदेर डाक शुने केऊ ना आछे, तुमि एकला चालो रे. का नाही आठवणार? आपल्याला ती माणसे पाहिली की त्या गाण्याचा अर्थ सगुण साकार झाल्यासारखे वाटते ना! गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे बोल दिसत असतात समोर. की वारा सुटेल, तुझ्या हातातला दिवा विझेलही, परंतु तू लाव आणि परत पुढे पाऊल टाक कारण तुला एकटय़ालाच जायचे आहे. गाणे झालेली ही माणसे! सूर आळवणारी नसूनही पाहणाऱयाच्या मनातले सूर जागे करणारी ही माणसे खरोखरच धन्य! कधी कधी तर हातात साधा दिवाही नसताना जिद्दीने ‘अंधार माझा सोबती’ असे म्हणत म्हणत ही माणसे चालत राहतात. रस्ता शोधत राहतात. त्यांच्या पाऊलखुणा अज्ञानावर उमटत राहतात आणि त्यांच्यासारख्याच लोकांसाठी नकळत रस्ता तयार होत जातो. पण सुरुवातीला ‘एकला चलो रे’ मोडमध्ये असताना त्यांना कोणी विचारतही नसतात. तयार मार्ग अनुसरणारे खूप असतात. अशा माणसांकडे पाहून अजून एक प्रसिद्ध चीज आठवते अरे तू जागत रहियो मनवा तू जागत रहियो मान ले मोरी बात जग झूठा सब माया झूठी कोई नहीं तेरा गुनिदास ये जग में हे आठवण्याचे कारणही तेच असते की हा वरती केलेला उपदेश पचवूनच अशी तथाकथित वेडी माणसे शहाणी झालेली असतात. काही माणसे अशी जगत असतात की त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की बाबा रे हे सगळे तू वर घेऊन तर नाही जाणार ना? तू ज्यांना माझे माझे म्हणतोस ते इथेच राहणार आहेत आणि तुला मात्र जावे लागणार आहे. एकदा विचार करा की मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय.. कुणाचे काही अडत नाही जाणाऱयावाचून! अगदी तेराव्या दिवशी मृत्यू नोंद होते आणि मग अस्तित्व फेरफारापुरतेच राहते. देह ठेवलेला असतो. गळय़ात हार पडत असतात. अबीर बुक्का उधळला जातो. रामनाम सत्य है म्हणत ते निर्जीव शरीर उचलले जाते आणि एकाएकी राम भजन कर लेना रे इक दिन जाना है भाई हे गाणे मनात अक्षरशः थैमान घालायला लागते. डोळे वाहायचे थांबत नसतात. पण त्याच डोळय़ांपुढे त्या गाण्याचा सीन येत असतो. ‘अवघाचि संसार’ या चित्रपटामधील हे गीत राजा गोसावी यांच्यावर चित्रित झाले आहे. यातला त्यांचा मुद्राभिनय कमाल आहे. तशीही ती भैरवी आहे. आणि अजब म्हणजे भैरवीतल्या या गाण्याने त्या चित्रपटाची सुरुवात आहे. कधीही ऐका. आवंढा आवरतच नाही. धोधो रडू कोसळत राहते. वास्तव प्रसंगात कल्पनेच्या ताकदीचे अफाट दर्शन घडवणारी अशी ती गाणी! भैरवी ही सुरुवात आहे हा विश्वास देणारी ती गाणी….
अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579