विजय चव्हाण / इचलकंरजी
येथे उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एका बाजूला पाणीपुरवठा विभागाची धडपड सुरु असताना शहरातील गॅस पाईपलाईन खोदाईमुळे जलवाहीनी फुटीचे सत्र सुरु झाले आहे. रविवारी निरामय हॉस्पिटलशेजारील गळती काढण्याचे नियोजन सुरू असतानाच रविवारी शिवतीर्थ येथील पाईपलाईन फुटली आहे. यामुळे पालिका अधिकाऱ्यांची दमछाक होत असून पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पाणीटंचाई भीषण होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया कृष्णा व पंचगंगा योजनेला गळती व प्रदूषणाचे ग्रहण लागल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी कट्टीमोळा योजना सुरु करणे, पंचगंगा व कृष्णेचा पाणीउपसा सुरळीत ठेवणे यासह अन्य उपायोजना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांकडून सुरु आहेत. पण गेल्या आठवडय़ापासून एक नवीनच समस्या उद्भवत आहे. शहरात भूमिगत पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्यासाठी खोदाई करण्याचे काम सुरु आहे. पण पोकलेनद्वारे खोदाई करताना अनेकदा शहरातील वितरण जलवाहिन्या अथवा चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहे.
निरामय हॉस्पिटलशेजारील एक चेंबर फुटल्यानंतर त्यामधून दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चेंबर दुरूस्तीसाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून गळती काढण्याचे काम सुरु केले. पण याचवेळी शिवतीर्थानजीक असलेल्या वाहतूक शाखेसमोर गॅस पाईपलाईन खोदाईचे काम सुरु असताना रविवारी सकाळी चेंबर फुटून पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी याबाबत पालिकेतील अधिकाऱयांना फोनवरून कल्पना दिली.
पण यावेळी निरामय हॉस्पिटलशेजारील चेंबर दुरुस्तीचे काम करणाऱया अधिकाऱयांना पुन्हा चेंबर फुटल्याचे समजल्यानंतर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. अगोदरच ऐन उन्हाळ्यात नागरिकांना आठवडय़ातून एकदाच पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरून जनभावना तीव्र आहेत. यासाठी खटाटोप करून कसाबसा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असलेल्या अधिकाऱयांना मात्र गळती किती ठिकाणची काढायची व पाणीपुरवठा किती दिवस बंद ठेवायचा हा यक्षप्रश्न सतावत आहे.
अखेर पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ
या उन्हाळ्यामध्ये शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे शक्यतो पाणीपुरवठा बंद न करण्याचे धोरण जलअभियंत्यांनी अंमलात आणले आहे. यासाठी कृष्णा योजनेला लागलेली छोटी-मोठी गळती काढण्याचे टाळत पाणीपुरवठा अबाधित राखण्याचे काम करण्यात आले. पण शहरातच गॅस पाईपलाईन खोदाई दरम्यान लागलेल्या मोठय़ा गळतीसाठी मात्र पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ पालिकेवर आली. यामुळे आता पाणीटंचाईचे स्वरूप भीषण होण्यापुर्वी तात्काळ ही गळती काढण्यासाठी धडपड सुरु आहे.