प्रतिनिधी / कोल्हापूर
इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित सुळकुड पाणी योजनेला गट-तट बाजूला ठेवून सहा तालुक्यातील शेतकऱयांनी ही योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या लढय़ाचे नेतृत्व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी करावे अशी असे साकडे सहा तालुक्यातील शेतकऱयांनी घातले आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर ,राधानगरी, भुदरगड व कागल या तालुक्यातील शेतकऱयांनी बुधवारी कोल्हापूर येथे समरजीत घाटगे यांची निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. शेतकऱयांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन समरजितसिंह घाटगे यांनी दिले आहे.
यावेळी घोसरवाडचे नंदकुमार नाईक म्हणाले, काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला अजून पाणी पुरत नाही. तरीही हे पंचगंगा प्रदुषित करून दूधगंगेतील पाणी मागत आहेत. ते आम्ही कदापिही देणार नाही. वारणे वरून योजना का झाली नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. सावर्डे खुर्द तालुका कागल येथील प्रताप पाटील म्हणाले, कालव्याची कामे अजून अपूर्ण आहेत. कालवा धारकांवर अन्याय होणार आहे. आता कुठे हिरवाई डोलणाऱया या भागाचे पण वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी या योजनेला कडाडून विरोध केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत. दत्तवाडचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नऊ गावांच्या पिण्याच्या व पाच गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.
दिंडनेर्लीचे विलास पाटील म्हणाले, वारणेच्या शेतकयांचा विरोध बघून दूधगंगेवर ही योजना रेटण्याचा प्रयत्न हाणून पाडू या असे आवाहन केले. निगवे खालसा तालुका करवीर येथील विलास कांजर म्हणाले, एका जाणकार मंत्र्याने लोकभावनेचा विचार न करता आम्हा लाभार्थ्यांवर ही योजना लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ठामपणे विरोध करूया. आनंदराव पाटील, कसबा सांगावचे विक्रमसिंह माने, बापुसो शेटे, आनंदा डाफळे एम. डी. कुलकणी, बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, अमरसिंह घोरपडे यांनी परखड भूमिका मांडली.
तर पाटबंधारेच्या अधिकाऱयांच्या घरासमोर आंदोलन
पाटबंधारे खात्याचे अधिकारी पदाधिकाऱयांच्या दबावाला बळी पडून पाण्याबाबत दिशाभूल करणारी आकडेवारी व अहवाल शासनास सादर करण्याची शक्यता आहे. दूधगंगा -वेदगंगा काठावरील शेतकऱयांच्या लोकभावना जाणून घेऊन त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा. अन्यथा त्यांच्या घरावर शेतकऱयांचा मोर्चा काढन्यात येईल असा इशारा नागाव तालुका करवीर येथील रंगराव तोरसकर यांनी दिला.