प्रतिनिधी / इचलकरंजी
येथे गेल्या २४ तासात ५ कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर शहर १०० टक्के लॉकडाऊन होणार या अफवेला गुरुवारी झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत पूर्णविराम मिळाला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
इचलकरंजी शहरात कुडचे व दातार मळा व कोल्हापूर नाका याठिकाणी २४ तासांत ५ कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. यानंतर संपूर्ण शहर १०० टक्के लॉकडाऊन होणार अशा अफवांना ऊत आल्याने नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पालिका सभागृहात सनियंत्रण समितीची बैठक बोलावली होती. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपाधीक्षक गणेश बिरादार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन केल्यास कसाबसा उर्जितावस्थेत येत असलेला यंत्रमाग व्यवसाय पुन्हा कोलमडून पडेल, यासाठी १०० टक्के लॉकडाऊन करू नये, असे मत सर्वांनीच व्यक्त केले. त्या ऐवजी शासनाने घालून दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानुसार रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत पूर्ण संचारबंदी, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत परवानगी असलेल्या सर्व आस्थापना सुरू राहतील, विनापरवाना सुरू केलेल्या चहा टपरी, पानटपरी, रसाचे गाडे यांच्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. सलून, स्पा, जिम यापुढेही बंदच राहतील. बाहेरून परत येणाऱ्या कामगारांचे १०० टक्के संस्थात्मक विलगीकरण करणे व ते न केल्यास कारखानदारांवर कारवाई करण्यात येणार, मास्क वापरणे सक्तीचे असणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिका प्रशासन व पोलिस यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.