कडोली ग्राम पंचायत निवडणूक धामधूम
वार्ताहर/ कडोली
ग्राम पंचायत निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्याने कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षाबरोबर झुंज देण्यासाठी यावेळी सत्ताधारी पक्ष आमदारांच्या विकासकामाचे श्रेय घेऊन मतदारांना आकर्षित करण्यात कितपत यश मिळविणार याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यात महत्त्वाची ग्राम पंचायत म्हणून कडोली ग्रा. पं. कडे पाहिले जाते. येथील राजकीय घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरवेळेप्रमाणे यावेळीही निवडणूक चुरशीची होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कडोली ग्रा. पं. मध्ये कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी गावांचा समावेश असून पूर्वीप्रमाणे सदस्य संख्या 27 इतकी असली तरी यावेळी प्रभागामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांची गणिते बदलणार आहेत. परिणामी इच्छुक उमेदवारांनी मतदारांची नव्याने चाचपणी सुरू केली आहे. यावेळेस महिलांसाठी 55 टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याने कडोली ग्राम पंचायतीमध्ये 14 महिला तर 13 पुरुष सदस्य निवडून येणार आहेत. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवार शोधण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत.
दुरंगी-तिरंगी लढत शक्य
मागील ग्रा. पं. निवडणुकीत म. ए. समिती आणि ग्राम विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली होती. बळकट म. ए. समितीशी कडवी झुंज देऊन ग्राम विकास आघाडीने सत्ता हाती घेतली होती. त्यावेळी ग्राम विकास आघाडीने 16 तर म. ए. समितीने 11 जागा जिंकल्या होत्या. पण या वेळेस लढतीचे स्वरुप नव्याने समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. म. ए. समितीचे उमेदवार भाजपच्या झेंडय़ाखाली निवडणूक लढविण्याची दाट शक्यता असून तसे न झाल्यास भाजप व काँग्रेसप्रणित ग्राम विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत निश्चित आहे. याशिवाय म. ए. समितीला वगळून भाजपने उमेदवारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध केल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्तांतर होणार का?
गेली पाच वर्षे काँग्रेसप्रणित ग्राम विकास आघाडीने आमदारांच्या सहकार्याने विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न केला. पण काही उणिवाही निर्माण केल्याने मतदारराजा नाराज झाला आहे. गेली काही वर्षे कडोली गावची बससेवा बंद करण्यात आली आहे. ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्राम पंचायतीच्या ग्राम सभेतही ठराव करण्यात आला. पण या ठरावाला केराची टोपली दाखविण्यात आली. बसअभावी विद्यार्थीवर्गाचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरी समस्या म्हणजे कडोली गावच्या प्रमुख पेठ गल्लीत अपूर्ण अवस्थेत राबविण्यात आलेला रस्ता रुंदीकरण प्रकल्प. या रस्ता रुंदीकरण प्रकल्पात गोरगरीब नागरिकांच्या घरांवर जेसीबी फिरविण्यात आला. रस्त्याच्या पूर्वेकडील भागात फूटपाथ वगैरे कोणतीही कामे अद्याप करण्यात आली नाहीत. केवळ घरे पाडण्याची घाई करण्यात आली. काहींनी अद्याप आर्थिक अडचणीमुळे घरांची डागडुजीही केली नाही. अशा नुकसानग्रस्त नागरिकांना घरे बांधून देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे तेथील मतदारराजा नाराज आहे. ग्राम विकास आघाडीने आमदारांच्या सहकार्याने ग्रा. पं. क्षेत्रात बरीच विकासकामे केली आहेत. कंग्राळी खुर्द ते बेन्नाळीपर्यंत रस्ता चांगल्या दर्जाचा केला. गाव पातळीवरही गल्लीतील अनेक रस्ते पूर्णत्वास नेले. गावात ग्रा. पं. कार्यालय आणि श्री कलमेश्वर मंदिराजवळ हायमास्ट दिवे लावण्यात आले. ही कामे ग्राम विकास आघाडीसाठी जमेची बाजू असली तरी या विकासकामावर जनतेकडून कितपत अपेक्षा मिळणार यावर ग्राम विकास आघाडीचे यश अवलंबून राहणार आहे.