पोलीस वनविभागाची कारवाई, दोघांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
इटनाळ (ता. रायबाग) जवळ पोलीस वनविभागाच्या पथकाने बेकायदा चंदनाची विक्री करणाऱया दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 22 किलो 720 ग्रॅम चंदन व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
इटनाळहून मुगळखोडकडे जाणाऱया रस्त्यावर चंदनाची विक्री करण्यासाठी दोघे जण मोटार सायकलवरुन येत असल्याची माहिती मिळताच पोलीस वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, अहवालदार एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून या जोडगोळीला अटक केली आहे.
मल्लिकार्जुन सदाशिव बजंत्री (वय 35), मारुती बाबु चिगरी (वय 45, दोघेही रा. खनदाळ, ता. रायबाग) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भा.दं.वि. 379 व कर्नाटक वनकायदा 86, 87-1963 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जोडगोळीने विक्रीसाठी चंदन कोठून चोरुन आणले याचा तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी चंदनाचे सहा ओंडके व तुकडे ताब्यात घेतले आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत 70 हजार रुपयांइतकी होते. या संबंधी हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल करुन पुढील तपास करण्यात येत आहे.