मंथन साहित्यिक-सांस्कृतिक सोसायटीतर्फे मधुरा वेलणकर यांची ऑनलाईन मुलाखत
प्रतिनिधी/ बेळगाव
हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न मी पाहिले. परंतु अचानक आणि नकळतपणे अभिनयाच्या क्षेत्रात आले. आपण जे काम करू ते मनापासून आणि नि÷sने करायला हवे, ही माझी भावना आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धी या पलीकडे जाऊन आपण समाजाचे काही देणे लागतो, हा संस्कार झाल्याने ‘मधुरव’ उपक्रमातून अनेकांच्या कार्याला समाजासमोर आणले, अशा भावना अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केल्या.
मंथन साहित्यिक व सांस्कृतिक सोसायटीतर्फे मधुरा यांची ऑनलाईन मुलाखत वीणा लोकूर यांनी घेतली. त्यावेळी मधुरा बोलत होत्या. तासभर चाललेल्या या मुलाखतीत त्यांनी आपला प्रवास उलगडला.
त्या म्हणाल्या, मुंबईमध्ये पार्ले टिळक ही शाळा आणि माहिममध्ये डी. जी. रुपाये या कॉलेजमध्ये माझे शिक्षण झाले. आजी संस्कृतची प्राध्यापिका व आई शिक्षिका असल्याने शिक्षणाला प्राधान्य होतेच. परंतु आजी लेखन करत असे. आई मंगला वेलणकर रंगरश्मी या संस्थेद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम बसवत असे. आणि आम्ही बहिणी त्यामध्ये काम करत असू. मात्र बहिणींच्या तुलनेत मी लाजरी होते. मला आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे मी अभिनयाच्या क्षेत्रात येईन असे कोणालाही वाटले नाही. वडील प्रदीप वेलणकर एअर इंडियामध्ये असल्याने हवाईसुंदरींना पाहिल्याने आपण हेच क्षेत्र निवडायचे, असे ठरविले होते.
मात्र रुपारेलमध्ये विविध एकांकिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. ‘रुपारेल’ वाचिक अभिनयाला खूप महत्त्व देते. तर प्रतिस्पर्धी एम. डी. कॉलेज आंगिक अभिनयाला महत्त्व देते. स्पर्धा करत असतानाच एम. डी. कॉलेजच्या अभिजित साटम यांची भेट झाली. त्यांनी मला ‘प्रपोज’ केले. परंतु मी तीन महिन्यांचा अवधी घेऊन मग हो म्हणाले, असेही त्यांनी सांगितले. वडिलांना अभिनय आवडत नव्हता. परंतु आजोबा बापू हे प्रभात चित्रमध्ये साहाय्यक म्हणून काम करत. आजोबांकडे अनेक दिग्गज कलाकार येत असत. परंतु वडिलांनी विजया मेहता यांचे एक शिबिर केले आणि त्यांना अभिनयाची गोडी लागली. आई आणि वडील दोघेही नोकरी सांभाळून अभिनय करत असत, अशी माहिती त्यांनी दिली.