भारत-चीन यांच्यात 16 तास चर्चा, देपसांगवर मतभेद कायम
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाखच्या पँगाँग सरोवर परिसरातून दोन्ही देशांनी त्यांची सेना माघारी घेतल्यानंतर गोग्रा आणि उष्ण झऱयांच्या प्रदेशातूनही अशीच सैन्यमाघार करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. मात्र, देपसांग आणि डेमलॉक संघर्षबिंदूंसंबंधी मात्र मतभेद कायम आहेत, असे सांगण्यात आले आहे.
पँगाँग येथील सैन्यमाघारीची प्रक्रिया निर्धारित कालावधीच्या आधीच पूर्ण झाली. भारताने फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंत, तर चीनने फिंगर 4 पासून फिंगर 8 च्या मागेपर्यंत माघार घेतली. तसेच चीनने निर्मनुष्य भूमीत स्थापन केलेल्या आपल्या चौक्या आणि बंकर्सही पाडविले आहेत. त्यामुळे या भागातील तणाव संपुष्टात आला आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये इतर स्थानांवरून सैन्यमाघार करण्यासंबंधी शनिवारी चर्चा सुरू झाली. ती 16 तास चालली.
प्रस्तावांची देवाणघेवाण
गोग्रा, उष्ण झरे, देपसांग आणि डेमलॉक येथून सैन्यमाघारीचे प्रस्ताव दोन्ही सेनांच्या अधिकाऱयांनी एकमेकांना रविवारच्या चर्चेत दिले. यापैकी गोग्रा आणि उष्ण झरे येथून माघारीवर एकमत झाले. मात्र डेमलॉक आणि देपसांगवर आणखी चर्चा होणे आवश्यक असल्याचे चीनने स्पष्ट केले. त्यामुळे त्यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. गोग्रा आणि उष्ण झरे प्रदेशांसंबंधी लवकरच पुढील चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष सैन्यमाघारीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. या संबंधीचे प्रस्ताव दोन्ही देशांच्या उच्चपदस्थांकडे पाठविण्यात येणार आहेत.
2013 नंतर प्रथमच…
देपसांग येथे चीनने 2013 मध्येच (मनमोहनसिंग सरकारच्या काळात) भारतीय गस्तीला बंदी घातली होती. 2012 मध्येच चीन या बिंदूपर्यंत पुढे सरकला होता. तथापि, गेल्या आठ वर्षांमध्ये प्रथमच चीन या बिंदूसंबंधीही चर्चा करण्यास तयार झाला आहे. त्यामुळे लडाखमधील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेमलॉक येथील निर्मनुष्य भूमीत (नो मेन्स लँड) प्रवेश केला होता.
इतर स्थानी स्थिती सोपी
उष्ण झरे, गलवान आणि गोग्रा येथे दोन्ही सेनांमध्ये सहजगत्या संमती होऊ शकते, असे चित्र आहे. गलवान येथे 20 जून 2020 या दिवशी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे किमान 45 सैनिक कामी आले होते. चीनने यापैकी पाच सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. मात्र, अनेक विदेशी वृत्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार मृत चीनी सैनिकांची संख्या किमान 45 आहे, असे दिसून येते.
सध्या उष्ण झरे आणि गोग्रा येथे चीनच्या एक दोन चौक्या आहेत, तसेच काही सैनिक येथे दिसून येतात. तथापि, या दोन्ही स्थानांवरून माघार घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. येथील स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे, असे भारताने स्पष्ट केले. मुख्य प्रश्न डेमलॉकचाच आहे, असेही बोलले जाते.
तणाव निवळण्याच्या मार्गावर…
पँगाँग येथील सैन्यमाघार अपेक्षेपेक्षा जास्त सहजगत्या व कमी वेळात झाली. ही प्रक्रिया पूर्ण होत असताना कोणताही अडचण उपस्थित झाली नाही. आता अन्य बिंदूंवरूनही अशाच प्रकारे माघार प्रक्रिया करण्यात यश येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. दोन्ही बाजू संयमाने आणि सावधपणे चर्चा करीत आहेत.