पंतप्रधान मोदींचे विधान -महाराज सुहेलदेव यांच्या स्मारक उभारणीस प्रारंभ
वृत्तसंस्था/ बहराइच
स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान देणारे महाराज सुहेलदेव यांच्या जयंतीदिनी मंगळवारी उत्तरप्रदेश सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बहराइचमध्ये महाराज सुहेलदेव स्मारकस्थळाच्या कार्याचा शुभारंभ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाला आहे. या सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल ऑनलाईन सहभागी झाले. सोहळय़ाला संबोधित करताना मोदींनी देशाच्या इतिहास लेखनात अन्याय झाल्याचे म्हटले आहे.
देशाला गुलाम करणारे किंवा गुलामीची मानसिकता असलेल्यांनी लिहिलेला इतिहासच केवळ भारताचा इतिहास नाही. भारताच्या सर्वसामान्य जनतेत, लोकगाथांमध्ये रचलेला-वसलेला इतिहास भारताचा आहे. हा इतिहास एका पिढीकडून दुसऱया पिढीपर्यंत पोहोचत राहिल्याचे मोदी म्हणाले. महापुरुषांचा त्याग, त्यांची तपस्या, संगम, शौर्य, हौतात्म्याचे स्मरण करणे, त्यांच्याकडून प्रेरणा मिळविण्याची याहून मोठी संधी नसेल. भारत आणि भारतीयत्वाच्या रक्षणासाठी बलिदान करणाऱया नायक-नायिकांना त्यांच्या कार्यानुरुप सन्मान मिळाला नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱयांना समजाविण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी कायद्यांवरून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. जमीन हिरावून घेणारे लोक शेतकऱयांचे उत्पन्न वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आमचे सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला समर्थ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी म्हणाले.