सत्राजित एकान्तवासात रुदन करत असताना त्याची पत्नी तेथे आली. ती अत्यंत साध्वी, सुशील, विचारी, प्रेमळ व सत्राजिताला अनुकूल अशी होती. आपला पती एकान्तवासात रुदन करतो आहे, तो काहीतरी संकटात आहे हे तिच्या लक्षात आले होते. अशावेळी आपण त्याला बोलते केले पाहिजे, त्याच्या मनातील चिंता जाणून घेतली पाहिजे, त्याला धीर द्यायला पाहिजे हे तिने मनोमन ठरवले. पत्नीचे हेच कर्तव्य नाही काय? ती आपल्या पतीला धीर देत म्हणाली-स्वामी! आपण काय हे रुदन करत आहात. प्रसेन दुर्दैवाने मृत्यू पावला. पण आता आपण कोणताही उपाय करून तो परत येणार आहे काय? जे घडून गेले ते भूतकाळात जमा झाले. कालचक्राची गती कुणाला थांबवता येते काय? जे होऊन गेले त्याचा शोक किती करावा? आता शांत मनाने आपल्या मनात काय विचार आले ते निःशंकपणे मला सांगा, म्हणजे आपले मन मोकळे होईल. मला ते पटेल की न पटेल याची चिंता आपण करू नये. त्यावर सत्राजित आपल्या पत्नीला म्हणाला – हे सुशीले! माझ्या माथ्यावर जे हे लांछन लावले गेले आहे ते मी कसे निवारू? कोणता उपाय केला असता तो कृष्णनाथ माझ्यावर प्रसन्न होईल व लोक मला क्षमा करतील याचाच मी विचार करतो आहे.
माझें देखोनियां वदन । अदीर्घद्रष्टा न म्हणती जन ।
बुद्धिमंद विचारहीन । पामर कृपण मूर्ख ऐसें ।
इतुके दोष माझ्या ठायीं । जनीं प्रकटचि दिसती पाहीं।
मणिसंग्रहें परमान्ययी । धनलोलुप जन म्हणती ।
इतुक्मया दोषांच्या निरसना । एक विचार स्फुरला मना ।
जरी मी निस्तरें येणें व्यसना । तरी मज आज्ञा देईं पां ।
सत्राजित पुढे म्हणतो – सुशीले! आज मला पाहून लोक अनेक दूषणे देतात. हा पुढचा मागचा काहीही विचार न करणारा बुद्धिमंद, विचारहीन आहे. हा पापी, कृपण, मूर्ख आहे. हा धनलोलूप आहे. हे सारे दोष माझ्या माथी मारले जातात. यातून सुटण्याचा एकच विचार माझ्या मनात सुचला आहे. तो तू आता शांतपणे ऐक.
जेंवि जाम्बवतें आपण । कन्यादानीं मणि आंदण ।
देऊनि केलें समाधान । तैसेंचि लांछन निरसावें ।
आपुली कन्या सत्यभामा । उपवर सुन्दर सद्गुणसीमा।
हे आर्पूनि मेघःश्यामा । दोषकाळीमा क्षाळावी ।
सत्यभामेच्या पाणिग्रहणीं। आंदणा दीजे स्यमंतकमणि।
धनलोभी हे सदोष वाणी । येथोनि कोणी न बोलती ।
सत्राजित आपल्या पत्नीला पुढे म्हणाला-हे प्रिये! जाम्बवंताने आपली कन्या जाम्बवंती कृष्णाला अर्पण केली. कन्यादान करताना त्याने आंदण म्हणून त्याच्या ताब्यात असलेला स्यमंतकमणी देखील कृष्णाला अर्पण केला. हे सारे तू जाणतेस. त्याचप्रमाणे आपणही आपली लाडकी कन्या कृष्णाला अर्पण करावी आणि लग्नात कन्यादान करताना स्यमंतकमणी कृष्णाला आंदण म्हणून द्यावा आणि आपल्यावर आलेले लांछन निवारावे असे मला वाटते.
Ad. देवदत्त परुळेकर