इस्लामपूर/प्रतिनिधी
कोव्हिड व नॉन कोव्हिड रुग्णांची अवस्था येथे सध्या ‘ना घर का, ना घाट का!’अशी झाली आहे. उपचार वेळेत मिळत नाहीत. बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना जितेपणी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. तर मृत्यूनंतर देखील भोग संपत नाहीत. जितेपणी जसे दवाखान्यात बेड नाहीत,तसेच मृत्यूनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. अर्धवट मृतदेह जळाल्याने कुत्र्यांनी लचके तोडल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जग भयभीत झाले आहे.कोव्हिड मार्च मध्ये दबक्या पावलांनी आला.सुरुवातीलाच इस्लामपूरच्या मुख्य गांधी चौकात एका पाठोपाठ २६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरासह वाळवा तालुका हादरला. प्रशासन सतर्क झाले. आरोग्य विभाग कामाला लागला.काही दिवसांत कडक लॉकडावून व अन्य उपाययोजना यामुळे कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली.पण लोकांतील गांभीर्य कमी झाले. प्रशासन आणि आरोग्य विभाग मरगळले. त्यामुळे पुन्हा जुलै महिन्यापासून कोरोनाचे आक्रमण मोठया प्रमाणात झाले. शहर व ग्रामीण भागात समूह संसर्ग झाल्याने कोरोनाची अवस्था बांध फुटल्यासारखी झाली.
वाळवा तालुक्यात सध्या रोज सरासरी ८० ते १०० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.त्याहून अनेक पटीत हृदयरोग,मधुमेह, उच्चरक्तदाब व साध्या सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेत.अशा वेळी शासकीय व खाजगी आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. अनेक दवाखान्यात रुग्णांना बेड मिळत नाही.त्यामुळे लोकांचा धीर सुटला आहे. आरोग्य विभाग भेदरला आहे. आणि महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासन भांबावले आहे. या परिस्थितीत अनेकजण कोरोनाने बळी जाण्यापेक्षा केवळ धास्तीने मृत्युमुखी पडत आहेत.