वेदनेतून, ईर्षा, इर्षेतून निवडणूक लढवली, तालुक्याचा इतिहास पुसण्याचा कुणी प्रयत्न करु नये
प्रतिनिधी / इस्लामपूर
वेदनेतून ईर्षा, इर्षेतून विकासाची उर्मी निर्माण झाली. त्यातूनच नगरपालिकेची निवडणूक लढवली. राजकारणात वितुष्ट वाढते. पण विचारांची लढाई विचाराने व्हायला हवी.पण इथं विरोधकांकडून संपवणे, नेस्तनाबूत करणे, ही संस्कृती आहे.चेहरा सोज्वळ असला तरी पाठीमागील गँग टेरर पाहिजे, असे एका नेत्यांचे वक्तव्य आहे. पण वाळवा तालुक्याला क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक, गीतकार यांचा वारसा आहे. तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न कुणी करु नये, असे आवाहन नगराध्यक्ष व सांगली जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले.
‘पाऊलखुणा सुसंस्कृत विचारांच्या…गतीमान विकासाच्या..’ या सदरात पाटील यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ(पुणे)यांनी घेतली. निशिकांतदादा युथ फाउंडेशन, निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन ने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.राजारामबापू नाट्यगृहात वर्तमान काळावर खुमासदार फटकेबाजी करीत झालेल्या मुलाखतीस नागरिकांनी मोठी गर्दी केली.
गाडगीळ यांच्या राजकारणात करिअर करायचे, हे निश्चित ठरले होते का?या प्रश्नावर पाटील म्हणाले, वडील प्रकाशतात्या पाटील यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे कमी वयात जबाबदारी पडली.त्यानंतर चुलते अशोकदादा यांच्या विचारांचा प्रभाव राहिला.अनुकंपा तत्वावर विद्युत महामंडळात बारामतीला नोकरीवर रुजू झालो.तात्यांचे कामगार चळवळीतील काम मोठे होते.४० हुन अधिक कामगारांना त्यांनी संघटीत केले होते.या काळात चळवळीतील दिग्गजांचा संपर्क आला.कामगार तात्यांच्या रुपात मला पहात होते.तात्यांनी केलेले काम हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. अशोकदादा यांच्याप्रमाणेच प्रकाशबापू पाटील, अण्णासाहेब डांगे यांचा प्रभाव असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, दादांचा स्पष्टवक्तेपणा, प्रकाशबापू यांचा नम्रता, विनयशीलता आणि डांगे यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचे कौशल्य शिकलो, असेही त्यांनी सांगितले.