पेट्रोलमध्ये प्रमाण वाढीमुळे घेतला निर्णय – क्षमता 1400 किलोलिटरपर्यंत वाढवणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
साखर उद्योगातील मोठी कंपनी श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने आता इथेनॉल निर्मिती प्रक्रियेमध्ये अधिक लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत 450 कोटी रुपये गुंतवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्याला कंपनी 430 किलोलिटर प्रति दिवसाला इथेनॉलचे उत्पादन घेते. हे उत्पादन कंपनीला आगामी काळामध्ये 1400 किलोलिटरपर्यंत दिवसाला न्यायचे आहे. यासंदर्भात योजना कंपनीने आखली असून त्याकरता आवश्यक गुंतवणुकीसाठी रेणुका शुगर कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे. याआधीच 720 किलोलिटर प्रति दिवस इथेनॉल निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली होती. पण आता वरील नव्या क्षमतेलाही मान्यता देण्यात आली आहे. भारत सरकारने अलीकडेच पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रेणुका शुगर्सने सदरचा क्षमता वाढीचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.