बांदा/प्रतिनिधी-
संपूर्ण कुटुंबाची काळजी करण्याचे काम महिला करत असतात. मात्र ते करत असताना मात्र आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. असे न करता आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. आपले नाव स्वकर्तृत्वाने समाजात निर्माण केले पाहिजे. आपल्यासाठी प्रत्येक क्षेत्र खुले आहे, म्हणूनच पुढे या आणि स्वतःला सिद्ध करा असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती मानसी धुरी यांनी केले.त्या इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 गावठण मध्ये महिला दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाच्या ग्रामपंचायत सदस्या आरती परब, अध्यक्षा श्रुती नाईक, डॉ अर्चना सावंत, पोलीस कर्मचारी सिद्धी गावडे, अदिती पालव, वैदही परब, कृतिका जाधव, मुख्याध्यापक पेडणेकर, आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांना डॉ अर्चना सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ अर्चना सावंत म्हणाल्या, प्रत्येक दिवस महिलांचाच असतो असे समजून आपण आनंदी राहा. आपण कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही चांगले आरोग्य ठेवलात तर तुमचे कुटुंब चांगले राहील असे त्या म्हणाल्या.
यावेळी आरती परब, पोलीस कर्मचारी सिद्धी गावडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका करमळकर यांनी तर आभारी कविता घुडे यांनी मानले.