वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे देशासह जगभरातील उद्योग व्यवसाय मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले आहेत. यामुळे काही क्षेत्रात मोठय़ा नुकसानीच्या कारणामुळे कर्मचाऱयांना कामावरुन कमी केले आहे. तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. परंतु अनलॉकच्या निर्णयानंतर अनेक कारखाने, उद्योग सुरू झाले असल्याने नवीन कर्मचाऱयांची भरती होत असून ही बाब दिलासादायक असल्याचे म्हटले जात आहे.
याचा प्रभाव म्हणून जवळपास 10.50 लाख इतक्या संख्येने नवे कामगार ऑगस्टमध्ये कर्मचारी निधी संघटनेशी (इपीएफओ) जोडले असल्याची माहिती नुकतीच इपीएफओने दिली आहे. या अगोदर जुलैमध्ये 7.48 लाख नवीन नोंदणी झाली होती. तसेच इपीएफओ हा विभाग संघटीत क्षेत्रांशी संबंधीत कर्मचाऱयांची नोंदणी दर्शवत असतो.
कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने नव्या सदस्य संख्येत घट दिसली होती. इपीएफओनुसार जूनमध्ये 3.85 लाख, मे 3.18 लाख नवी सदस्य नोंदणी झाली होती. या अगोदर एप्रिलमध्ये 1.33 लाख नोंदणी करण्यात आली आहे. चालू मार्चमध्ये नवीन नोंदणी घटून 5.72 लाखवर राहिली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये 10.21 लाख नवीन कर्मचारी इपीएफओशी जोडले गेल्याने दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये 78.58 लाख नवीन सदस्य इपीएफओशी प्रत्येक महिन्याला जोडलेले आहेत. हा आकडा मागील आर्थिक वर्षात 2018-19च्या दरम्यान 61.12 लाखावर राहिला होता.