मात्र, राजीनामा देण्यास नकार, जनतेला उद्देशून भाषण
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळाचा शेवट जवळ आल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. इम्रान खान यांच्या तहरिक ए इन्साफ या सत्ताधारी पक्षाने बहुमत गमवल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते सैरभैर झाल्याचेही पहावयास मिळत आहे. याच गोंधळात त्यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांना इस्लाम धर्माचा आधार घेऊन काही मुद्दे मांडावे लागल्याने ते आता निरवानिरव करण्याची भाषा करताना दिसत आहेत.
आपल्या भाषणात त्यांनी भारतावरही तोंडसुख घेतले. तसेच ‘परकीय हाता’मुळे पाकिस्तानवर दबाव आल्याचा आणि आपल्या सत्तेला धोका निर्माण झाल्याचा दावा केला. हा परकीय हात अमेरिकेचा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, त्वरित त्यांनी आपण चुकून अमेरिकेचे नाव घेतल्याचा खुलासा केला आणि कोणत्यातरी विदेशी हातामुळे आपल्याविरोधात वातावरण निर्मिती होत असल्याचा दावा केला.
पाकिस्तानला धमकीचा दावा
आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार असून राजीनामा देणार नाही. विरोधी पक्षांनी विदेशी शक्तींशी संगनमत करुन आपल्याला हुसकण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकार पडले तरी आपण स्वाभिमान सोडणार नाही. विदेशी शक्तीकडून सरकारला पत्र आले आहे. त्यात इम्रानखान सरकार पडले पाहिजे असे स्पष्ट नमूद आहे. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव संमत झाला तर मागच्या बाबी आम्ही विसरुन जाऊ. पण जर अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला तर पाकिस्तानला बघून घेऊ, अशी धमकी पत्रात असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.
पाकिस्तानच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ होत आहे. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. 22 कोटी लोकांच्या देशाला घाबरविण्याचे प्रयत्न विदेशातून होत आहेत. पाकिस्तानची प्रतिष्ठा यामुळे धोक्यात आली आहे. आम्ही असे कसे सहन करु शकतो ? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला.