ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जात आहे. दिवसाला तीन लाखांच्यावर नवे बाधित रुग्ण आढळत असल्याने औषधे, ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय उपकरणांचाही देशात तुटवडा निर्माण झाला आहे. भारतील या परिस्थितीविषयी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चिंता व्यक्त करत भारतासाठी प्रार्थना केली आहे.
इम्रान खान यांनी भारताबद्दल चिंता व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे. मी भारतीय नागरिकांसोबत आहे. आमच्या शेजारी देशासह जगभरात कोरोनाशी लढणारे लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. मानवतेला आव्हान देणारी ही जागतिक महामारी आपण एकजुटीने परतवून लावायला पाहिजे.’