ऑनलाईन टीम / तेहरान :
अफगाणिस्तान सीमारेषेलगत असणाऱ्या चाबहार ते जाहेदानपर्यंतच्या रेल्वे मार्ग उभारणीसाठी इराण आणि भारतात करार झाला होता. या प्रकल्पासाठी भारताकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण देत इराणने 4 वर्षांनंतर भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. आता इराण रेल्वे भारताच्या मदतीशिवाय हा प्रकल्प पूर्ण करणार आहे.
चाबहार ते जाहेदान हा 628 किमीचा रेल्वे मार्ग आहे.
हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जाणार आहे. इराण रेल्वे आणि इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेड हा रेल्वे मार्ग उभारणार होते. त्यासाठी दोन्ही देशात करार झाला होता. मात्र, इराणने आता स्वतःच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इराण रेल्वे या प्रकल्पासाठी त्यांच्या राष्ट्रीय विकास निधीची मदत घेणार आहे.
हा प्रकल्प भारताच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी असणाऱ्या कटिबद्धतेचा तसेच इराण आणि अफगाणिस्तानसोबत असणाऱ्या त्रिपक्षीय कराराचा भाग होता. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण दौऱ्यावर असताना या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. तर मागील आठवड्यात इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या रेल्वेमार्गाच्या उभारणीच्या कामास सुरुवात झाली.