ऑनलाईन टीम / तेहरान :
चाबहार ते जाहेदान या 628 किमी रेल्वे प्रकल्पातून भारताला हटवल्यानंतर इराणने भारताला आणखी एक झटका दिला आहे. इराणने पर्शियन गल्फमधील फरजद-बी वायू प्रकल्पातून भारताच्या ओएनजीसीला वगळले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
पर्शियन गल्फमधील फरजद-बी वायू प्रकल्प गॅस क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येत आहे. या ब्लॉकमध्ये 21.3 ट्रीलीयन घनफूट वायूचा साठा आहे. या वायू प्रकल्पावर मागील दहा वर्षांपासून काम सुरू होते. मात्र, चीनशी जवळीक वाढल्याने इराणने भारताला या प्रकल्पातून वगळले आहे. नॅशनल इराणीयन ऑईल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम. कर्बासीयान यांनी मागील आठवड्यात या प्रकल्पासाठी भारताच्या ओएनजीसी ऐवजी दुसऱ्या ऑपरेटरची नेमणूक केल्याचे सांगितले होते.
ओएनजीसी-ऑईल इंडिया आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांनी 2008 साली पर्शियन गल्फ मध्ये फरजद-बी वायू क्षेत्राचा शोध लावला. त्यानंतर या गॅस क्षेत्राच्या विकासासाठी इराणने ठेके घेण्याचे काम सुरू केले होते. या प्रकल्पासाठी इराणसोबत ओएनजीसीचा करार झाला होता. आता हा प्रकल्प इराणने स्वतःच पूर्ण करण्याचे ठरवले आहे.