भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे प्रतिपादन
ऍडलेड / वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला जलद गोलंदाज इशांत शर्माची प्रकर्षाने उणीव जाणवेल, अशी जाहीर कबुली उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिली. मात्र, याचवेळी अंतिम संघाची रचना कशी असेल, याबद्दल त्याने रणनीती किंचीतही उघड केली नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित, बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला उद्या (गुरुवार दि. 17) पहिल्या कसोटी सामन्यासह प्रारंभ होत आहे.
ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी परतत असून उर्वरित 3 कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाणे अपेक्षित आहे. पहिली कसोटी दिवस-रात्र स्वरुपाची असून गुलाबी चेंडूने खेळताना पहिल्या 40-50 मिनिटात फलंदाजांचा द्विप्रकाशामुळे चांगलाच कस लागेल, असा होरा रहाणेने येथे नोंदवला आहे.
‘आताही आमची गोलंदाजी भक्कम आहे. पण, तरीही सर्वात अनुभवी असलेल्या इशांत शर्माची आम्हाला प्रकर्षाने उणीव जाणवेल’, असे रहाणे येथे पुढे म्हणाला. इशांत सध्या आयपीएल स्पर्धेदरम्यान बरगडीला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. इशांतच्या गैरहजेरीत जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरकस मारा करतील, अशी खात्री त्याने व्यक्त केली.
‘उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी हे सर्व गोलंदाज बरेच अनुभवी आहेत आणि ऑस्ट्रेलियातील वातावरणात कशी गोलंदाजी करायची, याची त्यांना कल्पना आहे. गुलाबी चेंडूने मालिकेची सुरुवात होत असताना 20 बळी घेण्याची आमची निश्चितच क्षमता आहे’, असा विश्वासही रहाणेने नोंदवला.
महत्त्वाचे निर्णय अंतिम क्षणी
सध्याच्या घडीला भारताकडे सलामीसाठी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल व केएल राहुल असे 4 पर्याय आहेत तर यष्टीरक्षणासाठी वृद्धिमान साहा, ऋषभ पंत असे दोन पर्याय आहेत. मात्र, यासाठी अंतिम क्षणीच निर्णय घेतला जाईल, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
‘सलामीवीर कोण असतील व यष्टीरक्षणाची धुरा कोणाकडे, हे आम्ही अद्याप स्पष्ट केलेले नाही. आमच्याकडे आणखी एक दिवस हाताशी आहे. एक सराव सत्र बाकी आहे. त्यात आम्ही संघबांधणीबद्दल विचार करु. अर्थात, आमच्या दृष्टीने उपलब्ध प्रत्येक खेळाडू अव्वल दर्जाचा आहे’, असे तो पुढे म्हणाला. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची नेमकी कोणती भूमिका असेल, या प्रश्नावर त्याने थेट उत्तर दिले नाही. मात्र, पहिल्या कसोटीत तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल, असे तो म्हणाला.
गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक
दिवस-रात्र कसोटी लढतीत गुलाबी चेंडूने खेळताना 40 ते 50 मिनिटात कसा फरक पडतो, याचे विवेचन येथे रहाणेने केले. तो म्हणाला, ‘प्रारंभी, द्विप्रकाशात अर्थात फ्लडलाईटच्या व सूर्यप्रकाशात फलंदाजी करणे विशेष आव्हानात्मक असते. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू किंचीत वळतो. पण, पुढे 40 ते 50 मिनिटांच्या खेळानंतर फलंदाजी करणे बरेच सोपे होते. प्रारंभी साधारण वेग असतो. पण, नंतर चेंडूचा वेग वाढतो. लाल चेंडूने खेळत असताना चेंडूचा वेग अचानक वाढत नाही. पण, गुलाबी चेंडूने खेळत असताना 40-50 मिनिटातच चित्र बदलून जाते. या बदलाशी जुळवून घेण्यासाठी महिन्याभराचा सराव आणि दोन-एक प्रथमश्रेणी सामने खेळणे विशेष महत्त्वाचे असते आणि त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे’.
‘14 दिवसांचे क्वारन्टाईन कठीण होते. पण, सुदैवाने आम्हाला सरावाची मुभा मिळाली आणि त्यामुळे आम्ही उत्तम तयारी करु शकलो’, याचाही रहाणेने येथे उल्लेख केला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उद्यापासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.
पाठदुखीमुळे स्टीव्ह स्मिथची सराव सत्रातून माघार
ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथ मंगळवारी पाठदुखीमुळे सराव सत्रात उतरु शकला नाही. यजमान संघाला या मालिकेच्या प्रारंभी अनेक खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागले असून आता स्मिथच्या निमित्ताने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
स्मिथने मंगळवारी संघसहकाऱयांसमवेत 10 मिनिटे वार्मअप केले. मात्र, नंतर फुटबॉलचा सराव त्याने टाळला आणि त्यानंतर 10 मिनिटातच पाठदुखीच्या त्रासामुळे त्याने ड्रेसिंगरुमकडे परतणे पसंत केले. तो ड्रेसिंगरुमकडे परतत असताना त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचे फिजीओथेरपिस्ट डेव्हिड बीकली समवेत होते. ऑस्ट्रेलियाला यापूर्वी अनेक खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त केले असून डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्की यापूर्वीच पहिल्या कसोटीतून बाहेर फेकले गेले आहेत.
आश्वासक अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनने कन्कशन प्रोटोकॉल पार केले तर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळेल, असे संकेत आहेत. ग्रीनला यापूर्वी सराव सामन्यात जसप्रित बुमराहचा सामना करताना कन्कशनला सामोरे जावे लागले होते.