गाजा शहरात अनेक इमारती उद्ध्वस्त, इस्लामी देशांची बैठक
वृत्तसंस्था/ तेल अविव
हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर केलेल्या अग्नीबाणाच्या हल्लयाला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने गाजा शहरावरील हल्ले सुरूच ठेवले आहे. रविवारी इस्त्रायलने केलेल्या विमान हल्ल्यात शहरातील 33 नागरिक ठार झाले आहेत. गाजा शहरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून त्यांच्या ढिगाऱयाखाली असंख्य लोक दबले असल्याची शक्यता आहे.
इस्त्रायलच्या वायू हल्ल्याचा हा सलग सहावा दिवस होता. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये अधिकृत वृत्तानुसार 150 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. अनधिकृत वृत्तानुसार ही संख्या 1000 हून अधिक असावी, असे बोलले जाते. रविवारच्या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये 12 महिला आणि 8 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. 50 हून अधिक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
हमास नेत्याचे घर उद्ध्वस्त
हमास या संघटनेचा नेता याहीयेश सिन्वार याचे घर इस्त्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. गेल्या तीन दिवसांत हमासच्या किमान सहा नेत्यांची घरे बॉम्ब हल्ल्यात नष्ट झाली आहेत.
इस्लामी देशांची बैठक
गाजा पट्टीतील घटनांसंबंधी चर्चा करण्यासाठी 57 देशांच्या इस्लामी देशांच्या संघटनेची बैठक बैरुत येथे सुरू आहेत. रविवारी या बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात आले होते. पॅलेस्टॅनी नागरिकांना स्वतःचा देश देण्यात यावा, अशी मागणी या संघटनेतील अरब देशांनी केली आहे.
मतभेदही उघड
या परिषदेत इस्लामी देशांमध्ये असणारे मतभेदही काही प्रमाणात उघड झाले. पॅलेस्टाईनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बियाद मल्की यांनी या हल्ल्यासाठी इस्त्रायलला दोष दिला. इस्त्रायलने बराच काळपासून गाजापट्टी आणि वेस्ट बँक या पॅलेस्टाईनी भागांवर नियंत्रण मिळविलेले आहे. हेच या समस्येचे मूळ आहे, असे त्यांचे म्हणणे होते. तथापि पॅलेस्टाईनी प्रशासनाचा हमास या दहशतवादी संघटनेवर कोणताही वचक राहिलेला नाही. गाजा पट्टीतील काही भागांत हमासची मनमानी सुरू आहे. त्यामुळे संघर्ष चिघळला आहे, असे मत तुर्कस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मेव्हलत काऊसोगलू यांनी क्यक्त केले.
या हल्ल्यांसाठी केवळ इस्त्रायल जबाबदार आहे, असे मत इराणचे विदेश व्यवहार मंत्री महमद जवद झरीफ यांनी मांडले. कतार, दुबई, कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन, इत्यादी देशांनी या संघर्षत आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेचे मध्यस्थीचे प्रयत्न अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष चिघळल्याबद्दल चिंता व्यकत केली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी लवकरात लवकर शांतता बोलणी करावी आणि संघर्ष आटोक्यात आणावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. अमेरिकेने आपले शिष्टमंडळ इस्त्रायलकडे पाठविले असून एक दोन दिवसात चर्चेचे दरवाजे खुले होतील, अशी शक्यता आहे. तथापि हमास आणि इस्त्रायल यांच्यात कितपत समजोता होऊ शकेल, याबद्दल तज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. इस्त्रायल आणि अरब देश यांच्यातील संबंधावर या संघर्षाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही अनेक तज्ञांचे मत आहे.