पाकच्या गृहमंत्र्याला ओवैसी यांचे प्रत्युत्तर : मुजफ्फरनगर येथे सभा
वृत्तसंस्था /मुजफ्फरनगर
एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या शेजारी देशाचा एक मंत्री मूर्ख आहे. त्याने क्रिकेटमध्ये मिळालेल्या विजयाला इस्लामचा विजय ठरविले. आम्ही लोक तेथे गेलो नाहीत ही अल्लाहचीच कृपा. अन्यथा या मूर्ख मंत्र्याला झेलावे लागले असते. इस्लामचा क्रिकेटशी काय देणेघेणे असे प्रश्नार्थक विधान करत ओवैसी यांनी रशीद यांना लक्ष्य केले आहे.
स्वतःच्या देशाला (पाकिस्तान) चीनकडे गहाण ठेवता आणि इस्लामबद्दल बोलता, लाज कशी वाटत नाही? चीनने 20 लाख मुस्लिमांना कैद करून ठेवले आहे. मुस्लिमांना निषिद्ध गोष्टी करण्यास चीन भाग पाडत आहे. पाकिस्तान मलेरियावरील औषध देखील तयार करू शकत नाही, मोटरसायकलचा टायर तयार करू शकत नाही. भारत तुमच्यापेक्षा खूपच पुढे असल्याने आमच्याशी वैर पत्करू नका, असे ओवैसी यांनी सुनावले आहे.
ओवैसी यांनी मुजफ्फरनगर येथे प्रचारसभा घेतली आहे. मेरठ, त्यानंतर हाशिमपुरा आणि मग मलियानामध्ये झालेल्या दंगलीत किती लोकांचा जीव गेला? त्यानंतर 2013 मध्ये मुजफ्फरनगरमध्ये दंगली झाल्या, आज राजकीय लोक त्या दंगलींची आठवण करून मुस्लिमांची मते मिळवितात. पण मी मात्र मतांसाठी येथे आलो नसून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे राजकीय बळ वाढविण्यासाठी आलो आहे, असे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.
मुस्लिमांना लोकशाहीच्या मार्गाने न्याय मिळवून देणार आहे. दंगली घडू देणार नाही. मुस्लिमांना आता राजकीय शक्ती व्हावे लागेले. सप, बसप, काँग्रेस आणि रालोदसाठी कधीपर्यंत चटई अंथरत राहणार? तुमचा पक्ष एआयएमआयएमसाठी मतदान करण्याची आता वेळ आली आहे. माझ्या जीवनाचा उद्देश मुस्लिमांची राजकीय शक्ती वाढविणे हाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.