तहसिलदार राजाराम म्हात्रे शेतकऱ्यांच्या बांधावर
ओटवणे / प्रतिनिधी:
शासनाच्या ई पीक पाहणी व नोंदणीसाठी आंबोली मंडळात महसूल विभागामार्फत गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असुन ई पीक पाहणी व नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर काय उपाय योजना आहेत याचे प्रात्यक्षिक देण्यात येत आहे.
शासनाच्या ई-पिकपाहणी योजेनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची पिक पेऱ्यांची नोंद करावयाची आहे. त्याकरीता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये ई-पिकपाहणी अँप डाउनलोड करून त्यात आपल्या शेतात केलेल्या भात, आंबा, सुपारी, नागली, माडबाग आणि बांधावरची झाडे या पिकांची ऑनलाईन नोंदणी करून ती आपल्या सातबारा सदरी नोंद करून घेण्यासाठी शासनाने ही सुविधा दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन करून ई –पिकपाहणी नोंदी करण्याबाबत आंबोली मंडळ अधिकारी जी. आर. गुरव, दाणोली तलाठी एस. एम. चितारे, ओवळीये व पारपोलीचे तलाठी कैलास गावडे यांनी दाणोली सजातील दाणोली, देवसू. फणसवडे, केसरी, सातुळी, बावळाट या गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांना शासनाच्या ई-पीकपाहणी योजनेचे महत्व समजावुन सांगितले. ई-पीकपाहणी व नोंदणीला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून दाणोली आजपर्यंत २१० शेतकऱ्यांनी तर संपूर्ण आंबोली मंडळात १२०० शेतकऱ्यांच्या पिकपाण्यांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करून शासनाच्या या पिकपाहणी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आंबोली
मंडळ अधिकारी जी. आर. गुरव यांनी केले आहे. यावेळी ओवळीये पारपोलीचे तलाठी कैलास गावडे, सातुळी बावळाट सरपंच दिनानाथ कशाळीकर, लक्ष्मण माळकर, कोतवाल काशिराम जाधव, पोलिस पाटील, रुपेश सावंत आदिनाथ सावंत, परशूराम लांबर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.