वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोविड19 चा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱया बाजूला सरकारकडून विविध प्रकारचे सहाय्य देशातील जनतेला केले जात आहे. यामध्ये विविध योजनांमध्ये सवलत देणे तसेच नवीन आर्थिक धोरण जाहिर करणे अशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पहावयास मिळते आहे. यामध्येच सध्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (ईपीएफओ) मागील 15 दिवसांच्या कालावधीत तब्बल 10.02 लाख लोकांनी सादर केलेले दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती दिली आहे.
दावे निकाली काढताना वेगाने काम सुरु केले असून एकूण 3,600.85 कोटी रुपयांची रक्कम दाव्यात सादर केलेल्या लोकांच्या खात्यात जमा केली आहे तर ईपीएफओच्या माहितीनुसार यामध्ये 6.06 लाख दाव्यांचा निकाल हा कोरोना संकट आल्यानंतर लावला असल्याचे सांगितले आहे.
90 टक्के दावे 3 दिवसात
कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकट काळात सादर करण्यात येणाऱया अर्जामधील जवळपास 90 टक्के दावे हे फक्त 3 दिवसांमध्ये निकाली लावले असल्याचे स्पष्ट केले आहे. ईपीएफओने उमंग ऍपच्या मदतीने भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी आणि अन्य सेवांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
75 टक्के रक्कम काढण्यास मान्यता
कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून सध्या जवळपास 8 कोटी ईपीएफ खातेदारांना दिलासा दिला आहे. यामध्ये त्यांनी जमा केलेली ऍडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात ईपीएफ योजना 1952 च्या बदलानुसार सदर कर्मचारी हे आपल्या पीएफ खात्यात जमा रक्कमेपैकी 75 टक्के म्हणजे आपल्या तीन महिन्यांच्या वेतानाच्या बरोबरीची रक्कम काढण्यास मान्यता दिली आहे.