डोभाल यांची मोहीम यशस्वी : म्यानमारने 22 उग्रवाद्यांना सोपविले
नेपीतॉ / वृत्तसंस्था
ईशान्य भारतात उग्रवादी संघटनांच्या विरोधातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची व्यूहनीती यशस्वी ठरू लागली आहे. म्यानमारने ईशान्येत सक्रीय 22 उग्रवाद्यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. या उग्रवाद्यांना म्यानमारच्या सैन्याने चकमकीदरम्यान पकडले होते. भारतात हल्ला करून हे उग्रवादी सीमा ओलांडत म्यानमारमध्ये पलायन करायचे.
या 22 उग्रवाद्यांना विशेष विमानाने भारतात आणले गेले आहे. या उग्रवाद्यांना मणिपूर आणि आसाम पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असून तेथेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेतून भारत आणि म्यानमार यांच्या संबंधातील दृढता दिसून येत असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
विशेष विमानाने भारतात आणल्या गेलेल्या या उग्रवाद्यांपैकी काही जणांना मणिपूरची राजधानी इंफाळ येथे उतरविण्यात आले आहे. उर्वरित उग्रवाद्यांना गुवाहाटी येथील पोलिसांच्या हवाली करण्यात आले. म्यानमार सरकारने पहिल्यांदाच ईशान्येतील बंडखोर गटांच्या म्होरक्यांना सोपविण्याचे काम केल्याची माहिती डोभाल यांच्या मोहिमेशी निगडित एका अधिकाऱयाने दिली आहे.
बळकट सैन्यसंबंध
डोभाल यांच्या नेतृत्वात भारत आणि म्यानमार यांच्यातील सैन्य संबंध पूर्वीपेक्षा अधिक बळकट झाले आहेत. 2018 मध्ये भारतीय सैन्याने म्यानमार सैन्याच्या सहकार्याने ईशान्येत सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले होते. या कारवाईत मोठय़ा संख्येत उग्रवादी मारले गेले हेते.
उग्रवादी म्होरके
म्यानमारमधून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या उग्रवाद्यांमध्ये एनडीएफबी (एस)चा कथित गृहसचिव राजेन डायमरी, युएनएलएफचा कॅप्टन सनतोम्बा निंगथौजम याच्यासह आणखी एका उग्रवादी संघटनेचा कमांडर परशुराम लेशराम सामील आहे. या 22 उग्रवाद्यांपैकी 4 जण मणिपूरच्या बंडखोर गटांचे सदस्य आहेत. तर उर्वरित 10 जण आसाममधील उग्रवादी गटांचे सक्रीय सदस्य आहेत.
म्यानमारसोबत मोठी सीमा
म्यानमारसोबत भारताची 1,600 किलोमीटरची सीमा घनदाट जंगलाने वेढली गेलेली आहे. याचबरोबर तेथील नदी-नाले सैनिकांच्या गस्तकार्यामध्ये अडथळा ठरतात. भौगोलिक स्थितीचा लाभ या उग्रवादी संघटनांना होतो. हल्ले केल्यावर उग्रवादी गुप्त मार्गाने देशाची सीमा ओलांडून म्यानमारमध्ये पोहोचतात.