मणिपूर निवडणुकीकरता पंतप्रधानांची व्हर्च्युअल सभा
मणिपूर निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता 5 मार्च रोजी दुसरा टप्पा पार पडणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हर्च्युअल सभेला संबोधित केले. मणिपूरने सोमवारी एक नवा इतिहास रचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात मणिपूरने ईशान्येत आता विकासाचा सूर्यच उगवणार हे निश्चित केले आहे. मणिपूरला ज्या लोकांनी इतक्या दशकांपर्यंत विकासापासून मागे ढकलले, त्यांना येथील जनता पुन्हा संधी देणार नाही. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यात एम्सची स्थापना करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
मणिपूरमध्ये 2017 पूर्वी सत्तेवर असलेल्या सरकारांना येथील लोकांकडे कुठला पर्यायच नसल्याचे वाटत होते. मणिपूर अशा राजकीय पक्षांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण होते, काँग्रेसने मणिपूरचा विकास केला नाही. मणिपूरला शांततेपासून दूर ठेवले आणि फुटिरवाद वाढविला. काँग्रेसने पर्वतीय आणि खोऱयाच्या नावावर लोकांना विभागण्याचे षड्यंत्र रचले. काँग्रेसपासून मणिपूरच्या लोकांनी नेहमी सावध रहावे असे विधान मोदींनी केले आहे.
काँग्रेस होतेय ध्वस्त
केंद्र सरकारचे मंत्री आता अधिकाधिक ईशान्येत पोहोचत आहेत. ईशान्येतील विकासकामांचा मी स्वतः वारंवार आढावा घेत असतो. भाजप सरकार ‘गो टू हिल्स, गो टू व्हिलेज’ यासारख्या जोडणारी मोहीम राबवत असल्याने काँग्रेसचे षड्यंत्र अपयशी ठरत आहे. काँग्रेसचे फुट पाडा आणि राज्य करा हे धोरण विफल ठरू लागल्यावर काँग्रेसचे अस्तित्वही संपू लागले आहे. काँग्रेसच्या सरकारांनी मणिपूरला बॉम्बस्फोटांमध्ये जखडून ठेवले होते. परंतु आता हेच मणिपूर पूर्ण भारतासाठी निर्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रवेशद्वार ठरत असल्याचे मोदी म्हणाले.
मोठय़ा संख्येत मतदानाचे आवाहन
मणिपूरने नेहमीच भारताची एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व केले आहे. येथील लोकांनी स्वातंत्र्यलढय़ात स्वतःचे बलिदान दिले होते, परंतु काँग्रेसने मणिपूरच्या या इतिहासाला, बलिदानाला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना खऱया अर्थाने श्रद्धांजली देखील वाहिली नाही. 5 मार्च रोजी येथील जनतेने मोठय़ा संख्येत मतदान करावे, मणिपूरच्या शांततेसाठी, विकासासाठी, भविष्यासाठी मतदान करा असे आवाहन मोदींनी केले आहे.