सत्ताधारी विकास आघाडी व राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित : विकास आघाडीच्या चार नगरसेवकांचा समावेश : शिवसेना पाठींबा पत्रे घेवून सभागृहात : याच विषयावर दि. २७ रोजी सभा
प्रतिनिधी/इस्लामपूर
इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतर करण्याच्या विशेष सभेकडे राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांसह सत्ताधारी विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी पाठ फिरवली. ३२ पैकी अवघे १० नगरसेवक उपस्थित राहिले. त्यामुळे गणपूर्ती अभावी ही सभा रद्द करण्यात आली. शिवसेनेचे पाच ही नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार हे सह्यांच्या मोहिमेतील पाठींब्याच्या पत्रांचे बाड घेवून वाजत गाजत सभागृहात आले. पण सभा रद्दमुळे निर्णय लांबणीवर पडला असून या विषयासह अन्य विषयासाठी विशेष सभा पुन्हा दि. २७ रोजी होणार आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. साडे अकरा वाजता नगराध्यक्ष पाटील यांच्यासह विकास आघाडी, शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले. विकास आघाडीच्या चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवली. यामध्ये सत्ताधारी विकास आघाडीचे अमित ओसवाल, कोमल बनसोडे, अन्नपुर्णा फल्ले, चेतन शिंदे हे अनुपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण होण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यांनी शहरात पाठिंब्याच्या सह्यांची मोहिम राबवली. याच विषयासाठी नगरपालिकेत विशेष सभा घेण्यात आली. शिवेसेनेचे गटनेते पवार, नगरसेवक प्रदीप लोहार यांच्यासह शिवसैनिक कार्यालयापासून सह्यांच्या पाठिंब्यांची कागदपत्रे वाजत-गाजत घेवून आले. दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त होता. पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण चर्चेनंतर परवानगी मिळवून पवार छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा देत सभागृहात पोहचले.
दरम्यान राष्ट्रवादीची बाके रिकामी होती. तर सत्ताधारी गटाचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. सभा सुरु करण्यासाठी नियमानुसार ५० टक्के उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे अर्धा तास वाट पाहून सभा रद्दचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नगराध्यक्ष पाटील व पवार यांनी गुप्त चर्चा करुन या विषयासाठी दि.२७ ला सभा घेण्याचे जाहीर केले. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. शहरातील बारा बलुतेदार, आठरा पगड जातीच्या लोकांनी ईश्वरपूरसाठी सह्यांतून पाठिंबा दर्शवला आहे. आतापर्यंत ३० हजार लोकांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे नगरसेवक पाठीमागील विकास कामांच्या सभांनाही अनुपस्थित राहिले.
ते चुकीचा पायंडा पाडत आहेत, असा आरोप करतानाच दि.२७ च्या सभेच्या उपस्थितीसाठी सर्व नगरसेवकांच्या घरी जावून विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नगराध्यक्ष पाटील यांनी ईश्वरपूर नामांतरासाठी रासप, शिवप्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटनांची निवेदने प्राप्त झाल्याचे सांगितले.