अध्याय बारावा
शिवाचा जीवाशी संयोग झाल्यावर मुलाधारचक्रांच्या आधारे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी वाणी कशा निर्माण होतात हे सविस्तर सांगितल्यावर भगवंत म्हणाले, बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्पविकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया, महत्तत्त्व, तसेच सत्त्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये, हे सर्व मीच आहे असे समज. वाणी प्रगट होण्याचा जसा हा प्रकार आहे, त्याचप्रमाणे कर्माच्यामुळे इंद्रियांची प्रवृत्ती प्रकट होते. ही गोष्ट समजाऊन देण्यासाठी भगवंतांनी उद्धवाला लाकडी खेळण्याचे व सोन्याच्या दागिन्यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले खेळणे जरी कितीही सुबक दिसत असले तरी त्यातील लाकूडपण लपत नाही किंवा दागिने कीतीही मोहक दिसत असले तरी त्यामागील सोन्याचे महत्व कमी होत नाही. सोन्याचा नाग तयार केला असता त्याची फडा, शेपूट, आणि वाकडा बाक अशा आकारामुळे त्याला ‘नाग’ असे म्हणतात पण तो खरोखर नाग नसतो. ते उत्तम प्रतीचे सोनेच असते. त्याप्रमाणेच हे जगही मद्रूपच आहे. प्रपंच हा ईश्वराहून निराळा नाही. त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे. प्रथम तो एकच अव्यक्त होता. नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपांमध्ये प्रगट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला.
जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पावून प्रगट होते, तसेच हे आहे. शिव हे जीवाचे मूळ आहे. जीव आणि शिव हे रूपांनी भिन्न वाटतात म्हणून जीवपण निराळे दिसते. समुद्र हा आपल्या अंगावर खोळगे, भोंवरे तयार करतो, त्याप्रमाणेच श्रीहरीने ब्रह्मांडकमल उत्पन्न करून ते आपल्या नाभीमध्ये धारण केले आहे. म्हणूनच त्याला तीन लोकांना धारण करणारा असे म्हणतात. त्या नाभिकमलामध्येच आपल्या लीलेने तो त्रैलोक्मय धारण करतो, यामुळे श्रीहरीला ‘पद्मनाभ’ असे म्हणतात. सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचीच मूर्ती बसवून सोन्याच्याच फुलांनी तिची पूजा करावी म्हणजे ती तिन्ही एकरूपच भासतात.
त्याप्रमाणे नाभिकमलामध्ये त्रैलोक्मय धारण करून ते तिन्ही लोक एकच आहेत हे दाखवले जाते. म्हणून श्रुतीच्या मुखातून ‘पद्मनाभ’ असाच शब्द बाहेर पडला. सुगंध आणि मृदुत्व ह्यांमुळे पिवळी झालेली चाफ्याची कळी एकटी दिसते पण तीच अनेक पाकळय़ांनी प्रफुल्लीत होते, त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण अनेक लोकांच्या रूपाने विकसित झालो आहे. हे कार्य-कारण नव्हते त्याच्यापूर्वी मी अव्यक्तच होतो असे समज. मी सत्यातील सत्य आहे आणि माझ्या ठिकाणी भेद मुळीच नाही. मी अपार, अनादि, अनंत, आद्य आणि अव्यक्त आहे. ज्या स्वरूपाचा विचार करता करता लज्जीत होऊन वेदसुद्धा परत फिरले, तेच माझे शुद्ध स्वरूप होय. मी स्वतःच्या लीलाक्षोभानेच क्षुब्ध असा काळ होतो. मी आपल्याच सामर्थ्याने प्रबळ झालो आहे आणि माझ्याच शक्तीचा भयंकर विस्तार सर्वत्र चेतवून ठेवला आहे. त्या माझ्या शक्तीचे विभागही मीच नीटनेटके विभागून ठेविले आहेत. त्या विभागांचे विभाग मी सविस्तर सांगेन ऐक. गुणांची शक्ति, देवतांची शक्ति, मनाची शक्ति, इंद्रियांची शक्ति, महाभूतांची भूतशक्ति, ह्या सर्वांमध्ये क्रियाशक्ति हीच मुख्यतः असते.
जीवापासून जी अदृष्यशक्ति उत्पन्न झाली, ती त्रैलोक्मयात अनिवार आहे. ती हरिहरालासुद्धा आटपत नाही. याला प्रारब्ध असेही म्हणतात. या अदृष्यशक्तिने जीवाला बद्ध करून अगदी आपलेसे करून टाकले आहे, तिला आवरावयाला लागणारे सामर्थ्य माझ्यात नाही. अदृष्यशक्तीचे उल्लंघन मी मुळीच करीत नाही हे लक्षात ठेव. मी कर्माची स्थिती नाहीशी करतो पण अदृष्याची गती मी तोडत नाही. अथवा निश्चितपणे असे समज की, माझ्या मायेच्या शक्तीने मी एकटाच त्रैलोक्मयामध्ये अनेक व्यक्तरूपांनी भासमान होतो. जो जीवन्मुक्त झाला, तोच मत्स्वरूपाला येऊन पोचतो. परंतु तोही अदृष्यानेच बांधला गेला असल्यामुळे त्यालाही देहरूपी गृहामध्ये नानाप्रकारे वागावे लागते.
क्रमशः