किसान सन्मानसाठी ई-केवायसी सक्तीची : पोर्टलवर सुविधा
प्रतिनिधी /बेळगाव
किसान सन्मान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱयांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. ग्राम वन कार्यालय किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करता येईल.
अल्पभूधारक शेतकऱयांना प्रतिवषी 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम वर्षातून तीन टप्प्यात अदा केली जाते. मात्र कांहीजण खोटी माहिती पुरवून या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवाय एकाच कुटुंबातील सदस्यांना याचा लाभ होत आहे. अशांवर आळा घालण्यासाठी खात्याने हा निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधारला मोबाईल क्रमांक लिंक केलेला नाही अशा लाभार्थ्यांनी 15 रुपये शुल्क भरून बायोमेट्रिकच्या आधारावर ई-केवायसी करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान योजनेच्या पोर्ट्लवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱया शेतकऱयांना आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंद करावा लागणार आहे. शिवाय ओटीपीही आवश्यक आहे. आपल्या मोबाईल किंवा नागरिक सेवा केंद्रात ई-केवायसी करता येते.