मणिपूर काँग्रेसचा मोठा आरोप : आयोगाकडे केली तक्रार
मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. काँग्रेसने भाजपवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेस नेते तसेच मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी भाजप भूमिगत सशस्त्र उग्रवादी समुहांचा वापर करत असल्याचा दावा केला आहे. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.
एसओओ कॅडर्स, एनएससीएन आयएम यासारख्या समुहांवरून मुख्य निवडणूक अधिकाऱयाकडे तक्रार करण्यात आल्याचे इबोबी सिंह म्हणाले. आचारसंहितेचा उद्देश वर्तमान सरकारच्या निर्णयांमुळे निवडणूक प्रभावित होऊ नये हा असतो. परंतु मणिपूरमध्ये भाजपने केलेला प्रकार हा निष्पक्ष निवडणुकीचे उल्लंघन आहे. निवडणूक आयोग याप्रकरणी कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा असल्याचे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे.