उचगाव : येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उचगावचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया गणपत गल्लीतील रस्त्याची दुरुस्ती करून 14 वर्षे झाली. परिणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पाण्याची डबकी निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावरून चालणेदेखील मुश्किल झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
गणपत गल्ली व लक्ष्मी गल्ली या दोन गल्ल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली येतात. उचगाव बसस्थानक ते गोजगे बसस्थानक जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. 2007 मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कोणीही पाहिले नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ता दुरूस्ती कामाच्या शुभारंभाचा नारळ वाढविला. पण अद्याप या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण रखडलेले आहे.
गणेश मंदिराजवळील, गांधी चौकाशेजारील मोरीवरील फरशी फुटल्याने या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला आहे. या गल्लीतील सार्वजनिक नळांना चाव्या नसल्याने पाणी भरून झाल्यानंतर नागरिक तसेच नळ वाहते सोडतात. पाणीदेखील रस्त्याच्या मधून वाहत असते. यामुळे या गल्लीतील नागरिकांची गैरसोय होत आहे.
उचगाव ग्रामपंचायतीने तातडीने चिपिंग टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.