वार्ताहर /उचगाव
शासनाच्या महिला बालकल्याण खाते बेळगाव यांच्या विद्यमाने बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम कार्यक्रमाचे आयोजन उचगाव येथे करण्यात आले होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी ध्वनीफीतच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम याबाबत चित्रफित दाखविण्यात आली. यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी ग्राम पंचायत अध्यक्ष जावेद जमादार होते. कार्यक्रमाला मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले, ग्राम पंचायत सदस्य बळवंतराव उर्फ बंटी पावशे, यादो कांबळे, एल. डी. चौगुले, हनुमंत बुवा, शशी जाधव, सूरज सुतार, स्मिता खांडेकर, सेक्रेटरी मोकाशी तसेच महिला बालकल्याण खात्याचे चंद्रशेखर बाळकृष्ण आणि या खात्यातील अनेक अधिकारीवर्ग उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक चौगुले म्हणाले जर मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल तर अशा विवाहाला बालविवाह म्हटले जाते. बालविवाह केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होत आहेत. बालविवाहामध्ये भारत संपूर्ण जगात दुसऱया क्रमांकावर आहे. जगातील 40 टक्के बालविवाह भारतात होतात आणि भारतातील एकूण 50 टक्के मुलींचे विवाह 18 वर्षांपूर्वी केले जातात. भारतातील ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा जास्त बालविवाह होताना दिसतात. यासाठी बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाने बालविवाह पद्धत मोडीत काढावी, अशा प्रथेला बळी पडू नये, असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एल. डी. चौगुले तसेच बालकल्याण खात्याचे चंद्रशेखर यांनीही बालविवाह पद्धतीमुळे बालमनावर आणि आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात याची सविस्तर माहिती दिली. यावेळी मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींना तसेच अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामस्थांना बालविवाह विरोधी शपथ देवविली आणि मानवी साखळी या ठिकाणी करण्यात आली.