ग्रामपंचायतवतीने आयोजन : महिलांची लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर /उचगाव
सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो त्या घरामध्ये खऱया अर्थाने लक्ष्मी नांदते. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे. महिलांमुळे आज संस्कार व संस्कृती टिकली आहे, असे उद्गार एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांनी येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले. उचगाव ग्रा.पं.वतीने रोजगारस्थळी, रोजगार महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
कार्यक्रमाला ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व महिला दिनाचे महत्त्व सदस्य एल. डी. चौगुले यांनी सांगितले. व्यासपीठावर ग्रा. पं. सदस्य यादो कांबळे, स्मिता खांडेकर, ग्राम विकास अधिकारी वासू दत्ता, सचिव सुमेरा मोकाशी, रूपाली गिरी, रूपा गोंधळी, भारती जाधव, अंब्रीन बंकापूर, शशी जाधव, योगेश गिरी आदी उपस्थित
होते.
यावेळी कदम म्हणाले की, आमच्या देशात इंदिरा गांधी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील आदी महिलांनी उच्चपदावर काम केले आहे. या महिला कुठेही कमी पडलेल्या नाहीत. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर काम करत आहेत. ग्रामीण भागातील मुली पोलीस खात्यामध्ये मोठय़ा प्रमाणात भरती होत आहेत. त्या मुलींचा आदर्श इतर मुलींनी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. ग्राम विकास अधिकारी वासू दत्ता यांनी महिलांना रोजगार हमी योजनेबद्दल तसेच ग्रा. पं. विकासाबद्दल माहिती दिली. रोजगार हमी योजनेत भाग घेतलेल्या सर्व महिलांना ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे टोप्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 250 महिला व पुरुष सहभागी झाले होते.
रोजगार योजना ही महिलांसाठी उपयुक्त असल्याचे ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेमार्फत गावातील रस्ते, गटारी पावसाळय़ापूर्वी स्वच्छ करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शेतवडीमधील रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. मेळाव्यात उचगावमधील महिलांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.