वार्ताहर / उचगाव
‘जानबा तुकाराम जानबा तुकाराम आणि बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ च्या जयघोषांमध्ये उचगाव विभाग मार्कंडेय नदीकिनारी गंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाला प्रारंभ झाला. बाळू मारुती भक्तीकर व गोपाळ मरुचे यांच्या अधिष्ठानाखाली या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. उचगाव विभागातील जवळपास 14 गावातील वारकरी संप्रदायमधील सर्व वारकऱयांच्या साक्षीने या पारायण सोहळ्याची सुरुवात
झाली.
प्रारंभी मंडप उद्घाटन ज्ञानेश्वर पाटील (सोनोली) यांच्या हस्ते, ज्ञानेश्वर मूर्तीपूजन शंकर झंगरुचे (सोनोली), घट पूजन अभिजीत पाटील (सोनोली), तुळस पूजन प्रशांत झंगरुचे (सोनोली), होम पूजन गजानन कडोलकर (सोनोली), गणेश पूजन सुभाष झंगरुचे (सोनोली), तुकाराम मूर्ती पूजन संतोष पाटील (सोनोली), ग्रंथपूजन बलराज झंगरुचे (सोनोली), वीणा पूजन उमेश पाटील (सोनोली) यांच्याहस्ते या सर्व पूजा पार पडल्या. तर पारायण सोहळ्याचे उद्घाटन उमेश बुवा उचगाव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. सकाळी ध्वजवंदन तिरुपती मल्ल मोदगे बिल्डिंग कॉन्ट्रक्टर बसुर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी भैरू महाराज धामणे व निवृत्ती मुचंडीकर यांचे प्रवचन व कीर्तन पार पडले.
या सोहळ्याला मंगळवारी भक्तांनी गर्दी केली होती. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे-रोज पहाटे चार ते साडेपाचपर्यंत काकड आरती, साडेपाच ते साडे सहा नित्यपूजा, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, साडे दहा ते बारापर्यंत गाथा भजन, दुपारी दोन ते अडीचपर्यंत महिला भजन, अडीच ते चारपर्यंत हरिपाठ, संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा प्रवचन, संध्याकाळी साते ते नऊ कीर्तन निरुपण, रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत संगीत भजन व जागर याप्रमाणे रोजचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीपासून या पारायण मंडळाने रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात थोडासा बदल केला आहे. शासनाच्या नियमानुसार महाप्रसाद रविवार दि. 4 एप्रिल रोजी काला कीर्तनानंतर होणार आहे. दरवर्षी रोज सायंकाळी म्हणजेच रात्री प्रवचन व कीर्तन झाल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पारायण मंडळाने दखल घेत रोज होणारा महाप्रसाद बंद ठेवला असून शेवटच्या दिवशी समारोपाला काला कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.