उचगाव / वार्ताहर
उचगाव येथील नेम्मदी केंद्रामधील कारभार चव्हाटय़ावर आल्याच्या निषेधार्थ आणि येथील भ्रष्टाचार वाढल्याने उचगाव परिसरातील युवक संघटनांनी बुधवारी सकाळी संबंधित उपतहसीलदार यांना जाब विचारला आणि कार्यालयाला टाळे ठोकले. गोरगरीब नागरिकांची पिळवणूक थांबवा, अशी जोरदार मागणी करत नेम्मदी केंद्रासमोर निदर्शने केली.
या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की, उचगाव येथे शासकीय नेम्मदी केंद्र असून या केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱया अनेक गावातील नागरिकांची कामे या केंद्रामार्फत केली जातात. सध्या डिजिटल इंडिया या योजनेंतर्गत अनेक योजना राबविल्या जातात. त्याची अनेक कागदपत्रे या नेम्मदी केंद्रामधून दिली जातात. या बरोबरच वारसा सर्टिफिकेट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला अशा अनेक बाबी या नेम्मदी केंद्राच्या अधिपत्याखाली केल्या जातात. अलीकडेच या केंद्रामध्ये आलेले उपतहसीलदार यांनी मोठय़ा प्रमाणात या केंद्रामध्ये भ्रष्टाचार चालवला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकांच्या लक्षात ही बाब येताच युवक संघटनांनी बुधवारी सकाळी नेम्मदी केंद्रामध्ये जावून जोरदार निदर्शने केली आणि याचा जाब तहसीलदारांना विचारण्यात आला.
या नेम्मदी केंद्रामध्ये विविध कामांसाठी एक हजार रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते, असे युवकांचे म्हणणे आहे. यासाठीच नेम्मदी केंद्राच्या संबंधित अधिकाऱयांनी तातडीने उचगावला येऊन याची शहानिशा तसेच या घटनेची चौकशी करावी व भ्रष्ट अधिकाऱयांना निलंबित करावे आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी त्यांनी केली.