अतिक्रमणामुळे उचगाव महामार्ग चौक समस्यांच्या गर्तेत
संतोष माने / उचगाव
कोल्हापूर हूपरी रस्त्यावर उचगाव फाटा ते उचगाव महामार्ग चौक,ओढ्यापर्यंन्त टपऱ्या, विविध व्यवसायाची दुकाने ते हायफाय हॉटेल, भाजी, मटण,चहाची दुकाने, ऑफिस अशा अतिक्रमणाचा अक्षरशः धुमाकूळ झाला आहे. वाढता वाढता वाढे असा अतिक्रमणाचा चढता आलेख असुन गाळे ओढ्यापर्यन्त गेली असुन शेकडोच्या संख्येने झालेली अतिक्रमण त्वरीत हटवावीत अशी मागणी जनतेतून होत आहे.
अतिक्रमित गाळा मालकांचे डोळे दिपाविणारे भाडे, दररोज होणारी वाहतूक कोंडी, प्रदुषण त्याचप्रमाणे छोटे मोठे होणारे अपघात,ओपन बार त्यातून भांडणे, गुन्हेगारी, अवैध धंदे यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न गंभीरतेने घेणे गरजेचे बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, कृषी महाविद्यालय व उचगाव ग्रामपंचायत, गांधीनगर पोलिस यांनी एकत्रित येवून हा प्रश्न त्वरीत सोडविणे गरजेचे आहे.
व्यापारी केंद्र म्हणून उचगाव फाटा महामार्ग चौक प्रसिद्धीस आला आहे. जसे जसे औद्योगिकरण झाले तसे तसे उचगावचा विकास झपाट्याने होत गेला. कोल्हापूर शहरालगतचे गाव, पाण्याची सोय, जमिनीच्या वाढलेल्या किंमती यामुळे येथील लोकसंख्या वाढू लागली. कोल्हापूरसह गडमुडशिंगी, हुपरी चिंचवड, सरनोबतवाडी, वसगडे, सांगवडे, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, कागल, गांधीनगर आदी भागातून लोकांची ये-जा पाहता येथे दुकानांची संख्या वाढू लागली. सुरुवातीस एक-दोन दिसणाऱया टपरी यांची संख्या वाढली. यातूनच उचगाव फाट्याला, महामार्ग चौकाला अतिक्रमणांचा विळखा बसला. ग्रामपंचायतीने अतिक्रमणाचा विषय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे येत असल्याचे कारण पुढे केले तर सार्वजनिक बांधकाम खात्याने या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत आहे .फाट्यावरील बस स्टॉप पासून ते कोल्हापूर हूपरी रस्त्यावरील ओढ्यापर्यंत शेकडोंच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे रस्त्याला वाहनांचे पार्किंग होते. वारंवार वाहतुकीची कोंडी, छोटे-मोठे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावरच दुतर्फा पार्किंग होत असल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यातच महामार्ग चौकामधील सिग्नल बंद असल्याने येथे दिवसातून तीन ते चार वेळा मोठी वाहतूक कोंडी होते. याकडे गांधीनगर पोलिसांची दुर्लक्ष झाले आहे. याफाट्याच्या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे काही अपप्रवृत्तीनी यामध्ये प्रवेश केला. अतिक्रमित गाळे भाड्याने देऊन तसेच इतरांकडून हप्ता वसुली करणारे टोळकेच येथे कार्यरत आहे. गाळे, खोकी मिळवण्यात चढाओढ सुरू झाली. एकट्यालाच दोन-तीन खोकी मिळावेत यासाठी व त्यातून गुंडगिरीला खतपाणी घातले जात आहे. या फाट्यावर हप्ता वसुलीतून खून, अनेकदा तलवार हल्ला तर शुल्लक कारणावरून हाणामाया, महिलांची छेडछाड या घटना घडलेल्या आहेत.
कोणतेही कागदपत्र नसताना येथील अतिक्रमित जाळ्यामध्ये वीज मीटर देण्याची आगळीच वीज वितरण कंपनीच्या उजगाव शाखेने केले आहे यावेळी अतिक्रमण धारकांची धाडस वाढले आहे याची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
दरम्यान, याआधी “दै. तरुण भारत’ने या समस्येवर आवाज उठविल्यानंतर उचगाव चौकातील अतिक्रमण काढण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम खात्याने दाखवले होते. अतिक्रमणधारकांनी काही फूट मागे घेतले. मात्र त्यानंतर पुन्हा अतिक्रमणात वाढ झालेली आहे. चहा, छोटी हॉटेल्स पासून सर्वकाही हाय-फाय सोय असलेल्या गाळयांनी अतिक्रमणाचा अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतातरी सार्वजनिक बांधकाम खात्याने गांधीनगर पोलीस व उचगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने येथील अतिक्रमणाला आळा घालून त्वरित अतिक्रमण हटवावे अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.