कोरोना नियमावलीचा फज्जा : यात्रेवर निर्बंध नसल्याने भाविकांचा जीव टांगणीला : प्रशासनाने दखल घेण्याची मागणी
वार्ताहर / उचगाव
उचगाव येथील मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये शुक्रवारी यात्रेकरूंनी तोबा गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येणार असे तज्ञ व शासन सांगत असताना विना मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला आहे. मग या गर्दीचा परिणाम उचगावमधील नागरिकांना तसेच येथे यात्रेसाठी ये-जा करणाऱयांना कोरोनाची लागण झाली तर? याचा विचार कोण करणार? असा संशय निर्माण होत आहे. मोठय़ा प्रमाणात होणाऱया अशा यात्रेवर कोण निर्बंध लावणार की नाही, असा प्रश्नही या भागातील नागरिकांतून विचारला जात आहे.
उचगावची जागृत मळेकरणी देवीची सर्वत्र ख्याती आहे. प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी या आमराईत मोठय़ा प्रमाणात यात्रा भरते. कोरोना संसर्गामुळे मार्च 2020 पासून या यात्रेवर बंदी होती. नोव्हेंबर 2020 पासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मात्र मोठय़ा प्रमाणात यात्रा करण्यासाठी अद्याप परवानगी नसताना देखील येथे यात्रेकरूंनी तोबा गर्दी केल्याचे चित्र गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, यावर अद्याप आरोग्य खाते व शासनाने कोणतीही चौकशी करून निर्बंध लावल्याचे दिसत नाही.
कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू
उचगाव आणि परिसरात कोरोनामुळे अनेक जणांना मृत्यूशी सामना करावा लागला, अनेकांना जीव गमवावा लागला. ही उदाहरणे ताजी असताना मग शासन इतक्या मोठय़ा प्रमाणात यात्रेला परवानगी कशी देऊ शकते, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
संबंधितांना यात्रा करण्यासाठी मोजक्याच यात्रेकरूंना मुभा द्यावी, गर्दी करण्यावर निर्बंध लादावेत, या यात्रेचा परिणाम व नाहक त्रास दिवसेंदिवस आमराईच्या चोहोबाजूंनी असलेले रहिवासी, शेतकरी, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. याचा तातडीने विचार शासनाने करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा फटका उचगाववासियांना सहन करावा लागणार का?
बेळगाव, खानापूर, चंदगड या तालुक्यातून मंगळवार व शुक्रवार या दिवशी यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. जर एखादा कोरोना रुग्ण या गर्दीत येऊन संसर्ग पसरला तर झपाटय़ाने कोरोना बाधितांची संख्या वाढेल. याचा फटका मोठय़ा प्रमाणात उचगाववासियांनाही बसणार अशी चर्चा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानदार, हॉटेल, तसेच इतर सर्व दुकानांतून नागरिकांची ये-जा असते. यातूनच संसर्ग पसरेल याची भीती आणि धास्ती उचगाववासियांना लागून राहिली आहे.