खेडे गावांमध्ये महिला शेतावर राबतात हे आपल्याला माहिती असते. पण शहरातील उच्चशिक्षित महिला लठ्ठ वेतनाच्या नोकऱया सोडून शेतीकडे वळू शकतील, अशी कल्पनाही आपल्या मनात येण्याची शक्यता कमीच आहे. तथापि आज अशा अनेक महिला असून भविष्य काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही महिलांनी तर शेतीतून कोटय़वधीची कमाई केली आहे.
किरणप्रित या एक अशाच महिला आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर सुरू केला. त्याआधी त्यांनी जैविक शेती या विषयात शिक्षण घेतले. परंपरागत शेतीतून फायदा होत नाही हे त्यांनी वेळेवर जाणले आणि त्या सेंद्रीय शेतीकडे वळल्या. आता त्यांची ही शेती चांगलीच बहरली असून वर्षाकाठी 50 लाखाहून अधिक उलाढाल त्या करीत आहेत.
हिमाचल प्रदेशातील शांतादेवी या उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळल्या आहेत. लग्नानंतर त्यांना शेतीमध्ये रस वाटू लागला. इंटिग्रेटेड फार्मिंग या विषयात त्यांनी सखोल माहिती घेऊन आपल्याच वडिलोपोर्जित जमिनीवर हे प्रयोग सुरू केले. एकाच स्थानी वेगवेगळय़ा प्रकारच्या भाज्या आणि फळांचे उत्पादन घेणे याला इंटिग्रेटेड फार्मिंग असे म्हणतात. या बरोबरच त्यांनी पशूपालन आणि मधाचे उत्पादनही घेण्यास सुरुवात केली. सेंद्रीय पद्धतीचा अवलंब केल्याने कमी गुंतवणूक अधिक लाभ मिळविणे त्यांना शक्य होत आहे. त्यांचे यश बघून गावातील इतर महिलाही प्रेरित झाल्या आहेत. आणि त्यांनी हा मार्ग अवलंबिला आहे.
इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये कष्ट अधिक करावे लागतात. तथापि आता अनुभवाने त्यांना कमी श्रमात अधिक फळ कसे मिळवायचे, हे उमजले आहे. आता त्यांच्याकडे चार दुभत्या गायी असून त्यांनी डेअरी सुरू केली आहे. इतर महिलांनाही त्या प्रशिक्षण देतात. पॅरिसमध्ये राहणाऱया भारतीय वंशाच्या दीपा भगई यांची कहाणी तर वेगळीच आहे. त्या विदेशात राहत असूनही भारतीय शेतकऱयांबद्दल त्यांच्या मनात अतीव अनुकंपा आहे. भारतात त्यांची शेती असून तेथे अन्य महिलांच्या साहाय्याने जैविक शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. या शेतीवर त्या पॅरीसमधून ऑनलाईन नियंत्रण ठेवतात. त्यांच्या भारतातील सहकारी शेतकरी महिला येथे शेती करतात. बाजारपेठेचा अभ्यास करून कोणती पिके घ्यायची हे ठरविले जाते. त्यामुळे दर पडण्याचा तोटा नसतो, असे त्यांचे म्हणणे आहे.