वार्ताहर/गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी (ता. करवीर ) येथील इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई गँगच्या वाढत्या उपद्रवाला पायबंद घालून तीन दिवसात संपूर्ण गॅंग गजाआड करण्यात गोकुळ शिरगाव पोलिसांना यश आले. या गँगमधील चौघां संशयितांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.
इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई भाई, अक्षय पाटील, ओम्या इंदुलकर (तिघे रा. उजळाईवाडी ता. करवीर) व विनायक पाटील (रा. कणेरीवाडी ता. करवीर) असे या ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान नायकवडी उर्फ ईम्या यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी नेर्ली -तामगाव रोड, दळवी कॉलनी, उजळाईवाडी येथे आपल्या गॅंग मधील सदस्य अक्षय पाटील व चिक्या खवरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी रवींद्र सूर्यवंशी व त्यांचे शेजारी अनिल रामचंद्र पोवार यांच्या घरावर हल्ला केला होता. तर रविंद्र सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी व भावावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घरासमोरील स्कार्पिओ कार, दुचाकी, घराची शस्त्रांनी तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण उजळाईवाडी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातील संशयितांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे.
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार मानसिंग रजपूत, पोलीस हवालदार प्रदीप जाधव, राकेश माने, बाजीराव पाटील, हाउसिंग पाटील, संतोष तेलंग, युवराज कांबळे, सुरेश खोत ,धनाजी सपाटे यांनी धडक कारवाई करीत फरारी आरोपींचा तीन दिवसात शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.