वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी ता. करवीर येथील सरपंच सुवर्णा दिलीप माने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नाट्यमय घडामोडीनंतर एका मताने नामंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 18 पैकी 14 सदस्यांची ठरावाच्या बाजूने मतदान होणे आवश्यक होते. परंतु तेरा सदस्यच या विशेष सभेला उपस्थित होते. त्यामुळे अविश्वास ठराव एका मताने नामंजूर करण्यात आला. यावेळी अविश्वास ठराव सादर करण्यासाठी निवेदन देणाऱ्या १४ सदस्यांपैकी तानाजी शामराव चव्हाण हे सदस्य ही गैरहजर राहिल्याने उजळाईवाडी सरपंच विरोधात एकत्रित आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. उजळाईवाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा माने यांच्यासह १८ इतकी असून सदस्यसंख्येच्या ७५ टक्के म्हणजेच किमान १४ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते.
परंतु यापैकी तानाजी चव्हाण, प्रकाश मेटकरी, अजय पाटील, राजू गवाणकर व सरपंच सुवर्णा माने हे विशेष सभेस गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव साठी आवश्यक असणारे संख्याबळ जुळवता न आल्याने सदर ठराव नामंजूर करण्यात आला. सरपंच सुवर्णा माने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा ठपका ठेवत विरोधी सदस्यांनी बरोबरच सत्ताधारी सदस्यांनीही बंडाचा झेंडा फडकवला होता. परंतु सुवर्णा माने यांनी मुत्सद्दीपणाने राजकीय खेळी करत सदर अविश्वास ठराव फेटाळला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरच्या तहसीलदार शितल मुळे भामरे यांनी काम पाहिले.