प्रतिनिधी / बेळगाव
जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाची जबाबदारी ही राज्य सरकारची असून त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हे राज्य सरकारनेच केले पाहिजे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे. आरटीआय कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नैर्त्रुत्य रेल्वेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर असणाऱया गैरसोयी राज्य सरकारला दूर कराव्या लागणार आहेत.
एप्रिल 2018 मध्ये रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले होते. मागील वर्षभरापूर्वीपासून या रेल्वेउड्डाणपुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. दोन गर्डर एकमेकांना जोडण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पट्टय़ा आता निखळून बाहेर पडल्या आहेत. काही ठिकाणचे डांबरीकरण उखडल्यामुळे अवजड वाहने ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी हे खड्डे निदर्शनास न आल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे या ओव्हरब्रिजच्या दुर्दशेकडे लक्ष देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेकडे केली होती.
नैर्त्रुत्य रेल्वेने आपल्या उत्तरादाखल संबंधित ओव्हरब्रिजच्या देखभालीची जबाबदारी ही राज्य सरकारकडे आहे, असे म्हटले आहे. रस्ता तसेच इतर देखभालीची कामे राज्य सरकारने करावीत, असे लेखी उत्तरात कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.