प्रतिनिधी/ म्हापसा
कामरखाजन ते हॉटेल प्रिती इंटरनॅशनल दरम्यानच्या नागरिकांसाठी राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मधोमध उड्डाणपूल अथवा अंडर पास रस्ता उभारून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र तार नदी ते कामरखाजन दरम्यान एनएच 17 हा हमरस्ता उभारण्यात आल्याने कामरखाजन येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या भागातून सुमारे 2 किलोमीटर वळसा घेऊन परत यावे लागते त्यामुळे येथे आम्हाला उड्डाणपूल बांधावा अन्यथा अंडर पास रस्ता अन्य पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी येथील आकय कामरखाजनच्या नागरिकांनी आमदार ग्लेन टिकलो सौझा यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्याचे ओएसडी दिलीप पाध्ये यांनी या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त नागरिकांनी त्यांना बरेच धारेवर धरले. व त्यांनी आपण आमदारांच्या आमंत्रणावरून येथे आल्याचे स्पष्ट केले.
दुपारच्यावेळी आकय, कामरखाजन येथील सुमारे दीडशे नागरिक येथे जमा झाले. त्यांच्या चेहऱयावर रोष दिसून येत होता. आमदार ग्लेन टिकलो सौजा ओएसडी श्री. पाध्ये येथे आले असता त्यांनी प्रथम एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पाध्ये यांना जाब विचारून बरेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. याबाबत आराखडा आणला आहे काय? हे काम करणारे अभियंता कोण आहेत, आमदारांना याबाबत विश्वासात घेतले नाही काय? जनतेला विश्वासात न घेता सरकारने थेट हमरस्ता कसाकाय बांधला? यामध्ये राजकारण आहे काय? असे विविध प्रश्न करून अधिकारी पाध्ये यांना नागरिकांनी तसेच महिला वर्गांनी सळो की पळो करून सोडले. मात्र त्यांनी टिकलो यांनी हे सर्वकाही केले आहे असे सांगून आपले अंग यातून काढून घेतले. यावेळी नागरिक व अधिकारी वर्ग यांच्यामध्ये काहीवेळ शाब्दिक चकमकही उडाली. आपण नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्याचा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती त्यांनी आमदारांना दिली.
कामरखाजन हा गाव म्हापसा मतदारसंघास जोडून आहे. येथे सुमारे 4 हजार लोकांची वस्ती आहे. पूर्वी येथील लोक हमरस्ता ओलांडून हॉटेल प्रिती इंटरनॅशनल कडून म्हापसा बाजारपेठेत येत होते. 2 वर्षापूर्वीच येथे हमरस्त्याची दुरुस्ती करीत संपूर्ण रस्ता अत्याधुनिक पद्धतीने सिमेंटचा करण्यात आला व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पत्रे लावून रस्ता बंद करण्यात आला त्यामुळे या गावातील नागरिकांना सर्वीस रस्ता ओलांडून म्हापशात ये-जा करण्यासाठी सुमारे 2 किलोमीटर ये-जा करावे लागते. कामरखाजन व बिलवान म्हापसा येथील नागरिकांनी स्थानिक आमदार ग्लेन टिकलो सौजा यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या असता त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी दिलीप पाध्ये यांना घटनास्थळी बोलावून घेतले व नागरिकांनाही बोलावून आपापल्या समस्या जाणून दिल्या. यावेळी काहीकाळ वातावरण तंगही झाले. काही नागरिकांनी यास आमदार टिकलोच जबाबदार असल्याचे भाष्य केले. यावेळी बरीच चर्चा झाल्यानंतर आपण हा अहवाल संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गांकडे देणार असल्याची माहिती ओएसडी श्री. पाध्ये यांनी दिली.
हे प्रकरण केंद्रीय मंत्री गडकरीपर्यंत नेणार- ग्लेन टिकलो
दरम्यान या पाहणीनंतर आमदार ग्लेन टिकलो सौझा म्हणाले की, येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही कामरखाजन गावातील नागरिकांना येथे बोलावून घेतले होते. मुख्यमंत्र्याचे ओएसडी श्री. पाध्येही येथे आले असता येथील नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांबाबत चर्चा होऊन येथील नागरिकांनी रस्ता ओलांडण्यासाठी आम्हाला उड्डाणपूल उभारावा. अशी माहणी केली. आम्हाला दोन मिनिटाच्या अंतरासाठी दोन किलोमीटर पर्यंत अंतर कापावे लागते असे सूचित केले. नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या असून हे काम हमरस्त्याचे असल्याने येथे उड्डाणपूल उभारावा की नाही याबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून हे प्रकरण केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन मिनीटाच्या जागी दोन किलोमीटर जावे लागते- विकास आरोलकर (1022मॅप70)
येथील समाजसेवक विकास आरोलकर म्हणाले की, या हमरस्त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत आहे. स्थानिक नगरसेविका मर्लीन डिसोझा यांनी हा रस्ता दुरुस्त करून ये-जा करण्यास पर्यायी व्यवस्था करण्यात यील असे स्पष्ट केले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरल्यात जमा आहे. आमदाराने पुन्हा आश्वासन दिले आहे. आमदार पाच वर्षांनी पुन्हा आले आहे. आम्हा इस्पितळात जाण्यासाठी 2 किलोमीटर लांब जावे लागेल. सरकारने येथे उड्डाणपूल बांधून येथील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे विकास आरोलकर म्हणाले.
आमदारांनी यात लक्ष घातले नाही- अमरनाथ पणजीकर
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले की, आकय कामरखाजनच्या लोकांनी यापूर्वी मागणी केली होती की, कामरखाजन ते प्रिति इंटरनॅशनल हॉटेल दम्रयान अंडर पास रस्ता ठेवावा जेणेकरून हा गाव शहर, इस्पितळ, शाळेपासून वेगळा होऊ नये. आमदार तसेच दोन्ही नगरसेवकांनी आश्वासन दिले होते. सरकारही भाजपचा आहे, पालिका त्यांची आहे. लोकांना वेगळे ठेवले याचा जाब विचारण्यासाठी आज नागरिक येथे आलेले आहेत. सरकारने खोटारडेपणा करू नये. रुग्णवाहिका, छोटय़ा गाडय़ा, पायवाट द्यावी व या लोकांची दखल घ्यावी. आराखडय़ातही हे होते मात्र आमदार कंत्राटदारांनी यात लक्ष घातले नसल्याचे पणजीकर म्हणाले.
पारंपरिक वाट खुली करा- तारक आरोलकर
साईच्छा डेव्हलोपर्स चे मालक तथा उद्योजक तारक आरोलकर म्हणाले की, येथील लोकांची ही पारंपरिक वाट 150 वर्षापूर्वीची आहे. म्हापसाहून या वाडय़ावर ये-जा करीत होते मात्र ही वाट आता पूर्णतः बंद केली असून आकय, कामरखाजन गावातील नागरिकांना पाच मिनीटाचा रस्ता ओलांडण्यासाठी 15 मिनीटाचा प्रवास करावा लागतो. हे का झाले नाही याकडे विचार न करता सरकारने या नागरिकांच्या समस्यांकडे गांभिर्याने विचार करून पारंपरिक वाट खुली करावी वा येथे उड्डाण पूल उभारावा अशी मागणी आरोलकर यांनी केली.
दरम्यान या ठिकाणी चर्चेसाठी उपस्थित राहिलेले मुख्यमंत्र्यांचे ओएसडी दिलीप पाध्ये यांना चर्चा संपल्यानंतर याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी घेरले असता त्यांनी दोघां पत्रकारांचे पॅमेरे हात मारून हिसकावण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी त्यांना पॅमेरा हिसकावण्याबाबत जाब विचारला असता त्यांनी तेथून एकही शब्द न बोलता काढता पाय घेत आपल्या गाडीमध्ये बसून पळ काढला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्या वृत्तीचा निषेध करीत घटनेची माहिती उपस्थित आमदारांना दिली. मात्र आमदारांनीही याबाबत मौन पाळणे पसंत केले.