महानगरपालिका-कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य
प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे चौकाजवळील बसवेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर येथील काही पथदीप सुरू करण्यात आले आहेत. पण आता हे पथदीप रात्रंदिवस सुरू असल्याने मनपा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गोगटे चौकपासून मराठा मंदिरपर्यंतच्या बसवेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या काही महिन्यांपासून बंदच होते. पुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर काही महिने हे पथदीप व्यवस्थित सुरू होते. पण देखभालीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविल्यानंतर पथदिपांची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असूनही येथील पथदीप बंद स्थितीत
होते.
याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे पथदीप चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. पण चार दिवसांपूर्वी सुरू केलेले पथदीप रात्रंदिवस पेटत आहेत. त्यामुळे आता पथदिपांचा उजेड दिवसाही पडत आहे. महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने पथदीप बंद व सुरू करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या पथदिपांची देखभाल कोण करणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप बंदच
कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या महिनाभरापासून बंदच आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु एकच दिवस पथदीप सुरू होते. त्यानंतर ते बंद असून दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी उड्डाणपुलावर अंधार पसरलेला असतो. या पुलावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. पण पथदीप बंद असल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. संबंधित अधिकाऱयांनी याची नोंद गांभीर्याने घेऊन पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.