रेल्वे अधिकाऱयांची बैठक घेण्याकडे जिल्हाधिकाऱयांचे दुर्लक्ष, वाहनचालकांची होतेय गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात येणाऱया वाहनधारकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तिसरा रेल्वे गेट येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र सदर काम संथ गतीने सुरू असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी रेल्वे खात्याची बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते. पण बैठक घेण्यात आली नाही, अशातच रॅम्प उभारणीचे काम बंद पडले आहे. त्यामुळे उड्डाणपूल पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
तिसऱया रेल्वे गेटवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. सदर काम सुरू करून तीन वर्षे होत आली. पण हे काम अर्धवट स्थितीत आहे. रेल्वे मार्गादरम्यान स्पॅनची उभारणी करण्यात येणार असून स्पॅन निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे स्पॅन जानेवारी अखेरपर्यंत बसविण्यात येईल तसेच फेब्रुवारीअखेरपर्यंत उड्डाणपूल खुला करण्यात येईल, असे कंत्राटदारांकडून सांगण्यात आले होते. पण आतापर्यत स्पॅन बसविण्याचे काम झाले नाही. स्पॅनला रंग लावण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत स्पॅन बसविण्यात येईल, अशी माहिती उपलब्ध झाली
आहे.
रॅम्प उभारणीचे काम बंद
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूनी रॅम्पची उभारणी करण्यात येत आहे. पण रॅम्प उभारणीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रॅम्प निर्माण करण्याचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. एकंदर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांच्या समस्येत भर पडली आहे.
रेल्वे उड्डाणपुलाच्या सुरु असलेल्या संथकामाबद्दल जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांची बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते. पण फेब्रुवारीची 10 तारीख झाली तरी अद्याप बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी उड्डाणपुलाच्या उभारणीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत
आहे.