बेळगाव / प्रतिनिधी
जुन्या तहसिलदार कार्यालयात सुरू असलेले उतारा केंद्र सातत्याने बंद राहत असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. कार्यालय बंद असल्याने उताऱयासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. गुरुवारी उतारा केंद्र तांत्रिक कारणामुळे बंद ठेवण्यात आल्याची सूचना खिडकीवर लावण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना उताऱयाविना माघारी परतावे लागले.
पीक कर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बी-बियाणे, खते वाटप, जमीन खरेदी-विक्री, शासनाच्या शेतीसंबंधी योजना आदी कारणांसाठी शेतकऱयांना सात-बारा महत्त्वाचा आहे. मात्र, उतारा केंद्र वारंवार बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. काही ना काही कारण पुढे करून उतारा केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना कार्यालयाच्या पायऱया झिजव्यावा लागत आहेत. त्यामुळे उतारा केंद्राचे काम सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.
सर्वसामान्य जनतेला वेळेत उतारे मिळावेत, यासाठी बेळगाव तहसीलदार कार्यालयासह इतर ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जुन्या तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र गुरुवारी बंद होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसाचा फटका शेतीला बसला आहे. सोयाबिन व बटाटा बियाणे कुजल्याने बटाटा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई मिळविण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी सातबारा उतारा लागतो. मात्र सात-बारा उतारा वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची कामे लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे तातडीने उतारा केंद्र सुरळीत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.