जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची संकल्पना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र कोरोनाविरोधातील ही लढाई यशस्वीपणे जिंकण्यासाठी कोरोनासंदर्भात उत्तम काम करणाऱया कृती दलांना ’’कोरोना लढा सन्मान’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर 2 लाख तर तालुकास्तरावर 1 लाख, 50 हजार, 25 हजार आणि मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या सन्मानची घोषणा केली असून सर्वाच्या साथीने जिल्हा कोरोनावर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे कृती दलाला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच गावात उत्तम प्रकारे काम सुरू राहील, एक सिस्टीम डेव्हलप होईल, लोकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारे ग्राम कृती दलांना प्रोत्साहन देण्यासाठी ’कोरोना लढा सन्मान’ हा उपक्रम राबवणारा बहुधा रत्नागिरी राज्यातील बहुधा पहिला जिल्हा आहे.
या स्पर्धेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये आलेल्या प्रवाशांशी सौहार्दपूर्ण वागणूक, कोरोना कारणास्तव कोणताही वाद, भांडणे व कायदा सुव्यवस्था स्थिती न बिघडवणे, बाहेरून आलेल्या व्यक्तींना पुरवण्यात आलेल्या सुविधा, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी यांनी दिलेल्या वेळोवेळी भेटीच्या नोंदी, सोशल डिस्टंन्सिगची अंमलबजावणी, जनजागृतीसाठी केलेले विशेष प्रयत्न, अत्यावश्यक सेवासुविधा पुरवठा व वितरण, बचतगटांची मदत आदी 15 निकष ठेवण्यात आले आहेत. 15 जूनपर्यंत ग्रामपंचायत आणि नगर परिषदेने स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्वयंमूल्यमापन अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
गावांना थेट निधी देऊन मदत करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहेच, मात्र या कोरोना काळात एक प्रोत्साहन देण्यासाठी आगळी स्पर्धा घेण्याचा विचार आला. जेणेकरून गावांमध्ये अधिक उत्तम काम होईल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. हा उपक्रम नागरिकांना एक वेगळी दिशा देईल, असेही त्यांनी सांगितले. 30 जूनला निवड समिती पुरस्कारांची निवड करेल.
राज्यासाठी ठरेल रोल मॉडेल
सगळीकडे कोरोना या संकटाने व्यापले असून प्रत्येक जिल्हा आपल्या पातळीवर विविध उपक्रम हाती घेत आहे. जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. असाच प्रयत्न रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केला असला तरी हा उपक्रम कितपत यशस्वी होतो, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यासाठी एक रोल मॉडेल ठरु शकतो.